पुणे – स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी खासगी क्लासेसची गरज आहे? यात शिकविणारे कोण आहेत, हे सर्वांना माहीत असतात. खास मुलाखतीसाठी स्वतंत्र क्लासेस आहेत, या सर्वांची आवश्यकता आहे का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. गावातील उमेदवारांना शहरी वातावरणात तीन- चार महिन्यांत जुळवून घेता आले पाहिजे.
त्यावरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिका स्वरूपावरून अभ्यासाची तयारी आपल्या गावीही करता येणे शक्य आहे, असा सल्ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी आज येथे दिला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि समर्थ युवा फाउंडेशनतर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा, संधी आणि आव्हाने या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते.
या वेळी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. संजीव सोनवणे, मुक्त विद्यापीठ पुणे विभागाचे संचालक डाॅ. व्ही. बी. गायकवाड, प्रकाश देशमुख, फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, प्राचार्य संजय चाकणे आदी उपस्थित होते. बुद्धिचा विकास एकांतात आणि चारित्र्याचा विकास संगतीत होतो, हे नेहमी लक्षात ठेवा.
आपण प्रशासकीय सेवेत का जात आहोत, त्याचे उद्दिष्ठ ठेवून ध्येयाप्रती प्रयत्न करा. इंस्टाग्राम, फेसबूक आणि व्हाॅट्स अॅपचा वापर करणे बंद करा. त्यातून नकळतपणे किती वेळ जातो, याचे भानही राहात नाही. अनावश्यक ग्रुपमधून बाहेर पडा. हुशार मित्रांचे समूह तयार करा. त्यात आज केलेल्या अभ्यासाचे सविस्तर मांडणी प्रत्येकांनी समूहात मांडा.
त्यावर प्रत्यक्षरीत्या चर्चा करा. त्याच पद्धतीने मुलाखतीची तयारी करा. दैनंदिनी लिहून ठेवा, याकडे निंबाळकर यांनी लक्ष वेधले, तसेच २०२५ पासून वर्णनात्मक पद्धतीने होणाऱ्या परीक्षेची मानसिकता आतापासून तयारी ठेवावी, असेही ते म्हणाले. कुलगुरूपदाचा प्रवास हा प्लॅन बीमधून झाला आहे, असे सांगून डाॅ. संजीव सोनवणे म्हणाले,
नित्यनियमाने व्यायाम, वाचन व चिकीत्सक अभ्यास करणे आवश्यक आहे. स्वत:ला ओळखा आाणि त्यादृष्टीने आयुष्याकडे वाटचाल करा. संयोजक राजेश पांडे म्हणाले, स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांसाठी मुक्त विद्यापीठाच्या सहकार्याने भविष्यात अनेक योजना करण्याचा प्रयत्न आहे. त्यातून मदत करण्याची भूमिका आहे. त्याच उद्देशाने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
प्लॅन बी तयार ठेवा…
उमेदवारांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना काही नियम स्वत:ला घालून घेणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेत तिसऱ्या प्रयत्नापर्यंत यश मिळायला हवे. त्यानंतर चौथ्या परीक्षेची खात्री वाटत असेल तर तयारी करा. त्यानंतर यश न मिळाल्यास अखेर प्लॅन बी तयार ठेवा. दुसरा पर्याय म्हणजे न्यूनगंड न बाळगता ती एक संधी म्हणून समजायला हवे. त्यातून आयुष्यात अनेक यशस्वी झाले आहेत, असेही किशोरराजे निंबाळकर म्हणाले