नोएडा – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तरप्रदेशची संस्कृती आणि जनतेच्या खाण्या-पिण्याच्या सवयींचा अपमान केला. तरीही त्यांचा पाठिंबा कशासाठी घेतला जातोय, असा सवाल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना उद्देशून केला.
ममता उत्तरप्रदेशात सपचा प्रचार करणार आहेत. त्यावरून भाजपच्या एका प्रचार कार्यक्रमात बोलताना स्मृती यांनी अखिलेश यांच्यावर टीकास्त्र सोडले. अखिलेश यांना स्वत:च्या जोरावर जनतेचा पाठिंबा मिळत नसावा. त्यामुळेच ते इतरांचा पाठिंबा घेत आहेत, अशी खिल्ली स्मृती यांनी उडवली.
उत्तरप्रदेशातून लोकसभेवर निवडून जाणे हे मी माझे भाग्य समजते. संस्कार, संस्कृतीची परिभाषा बनवणारी भूमी म्हणून उत्तरप्रदेशची ओळख आहे. आता ती भूमी विकासाची नवी व्याख्या तयार करत आहे. भाजप सत्तेवर आल्यापासून राज्यात मोठ-मोठे प्रकल्प सुरू झाले आहेत, असे त्या म्हणाल्या. स्मृती लोकसभेत उत्तरप्रदेशातील अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी 2019 मधील लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना पराभूत करण्याची किमया केली.