मुंबई: आम्हाला आयपीएस किंवा सरकारी नोकरीवर लागण्यासाठी एमपीएसी, यूपीएससी सारख्या पूर्वपरीक्षा द्याव्या लागतात. मात्र जर कुणाला राजकारणात यायचं झाल्यास त्यांची परीक्षा का घेण्यात येत नाही. त्यांना डायरेक्ट तिकीट का देण्यात येते? असा प्रश्न एका विद्यार्थिनीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना विचारला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, मुंबईतर्फे युवा संवादाचा कार्यक्रम आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
शरद पवार त्या विद्यार्थिनीच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले, जास्तीत जास्त कष्ट करणं, नाउमेद न होणं, पराभव झाला तरी चिंता न करणं आणि पराभव झाला तरी नव्या उभारीने त्याच्यामध्ये पाऊल टाकणं त्यानंतर तू १०० टक्के यशस्वी होशील, असे पवार म्हणाले.
राजश्री वाघमारे या विद्यार्थिनीने हा प्रश्न शरद पवारांना विचारला होता. दरम्यान शरद पवार म्हणाले, माझं वय ८० वर्षांचं झालंय पण तरी विचार करण्याची प्रक्रिया ८० वर्षांपर्यंत गेली नाही. मुंबई विद्यापठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली याचा मला आनंद आहे. यातून मला जाणून घ्यायचं आहे की तुमची पिढी आणि माझ्या पिढीत किती अंतर वाढलंय? माझं वय ८० वर्षांचं झालंय पण तरी विचार करण्याची प्रक्रिया ८० वर्षांपर्यंत गेली नाही.
५२ वर्षांपूर्वी मी महाराष्ट्र विधानसभेत वयाच्या २६ व्या वर्षी पहिल्यांदा निवडून आलो. हे सांगायचं कारण केवळ हेच आहे की २६ व्या वर्षी देखील आपण विधानसभेत निवडून येऊ शकतो हा पर्याय तुम्हाला कळायला हवा. या पन्नास वर्षांच्या काळात अनेक गोष्टी होऊन गेल्या. कधी सत्तेत, कधी विरोधक म्हणून अनेक जबाबदाऱ्या सांभाळण्याची संधी मला मिळाली. या काळात नव्या पिढीशी संवाद साधण्याची संधी मिळाली की अधिक उत्साहाने काम करण्याची भावना तयार व्हायची.