कोल्हापूर – दोन हजारांच्या नोटबंदीनंतर विरोधी पक्षातील नेते केंद्र सरकरावर टीका करत आहेत. यातच आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत केंद्र सरकारवर टीका केली आहे. दोन हजाराच्या नोटा बंद करण्याचे कारण काय? हे केंद्र सरकार किंवा आरबीआयने सांगितले पाहिजे, असे अजित पवार म्हणाले आहेत.
“देशहितासाठी काही निर्णय असेल तर आमचा नेहमी पाठिंबा आहे. परंतु, केंद्र सरकार ज्या पद्धतीनं निर्णय घेत आहे, ते आतापर्यंत कोणत्याही सरकारने घेतले नाही. आता केलेली दोन हजाराची नोट बंदी असाच प्रकार आहे. तुम्ही म्हणतात, यामुळे काळा पैसा बाहेर येईल. तसे असेल तर चांगलेच आहे,” असे अजित पवार म्हणाले.
“यापूर्वी नोटा बंद झाल्या, त्यावेळी लोकांनी खूप काही सहन केले होते. या नोटबंदीमधून काळा पैसा बाहेर येईल आणि खोट्या नोटांना आळा बसेल, असं सर्वसामान्यांना वाटलं होतं. त्यामुळं त्यांनी ते सहन केले आहे. परंतु या निर्णयाचा लोकांना फार त्रास होईल असं वाटत नाही. अनेक महिने दोन हजार रुपयांच्या नोटा छपाई बंद झाली होती.”
“बनावट नोटा, बाहेरच्या लोकांनी चलन अडचणीत आणायचा प्रयत्न केल्यास बदल करावे लागतात. पण हे सारखं सारखं का करावं लागतं? याचा विचार केला पाहिजे”, असा सल्ला देखील अजित पवार यांनी सरकारला दिला.
यावेळी अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील महिलेवर घडलेल्या अतिप्रसंगाबाबतही भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस खात्यात आदरयुक्त दबदबा निर्माण केला पाहिजे. गुन्हेगारांवर कारवाई करणाऱ्या अधिकारी वर्गाला प्रोत्साहन दिले तरच बलात्कारांसारख्या गोष्टी आणि गुन्हेगारी थांबू शकते, असे म्हणत फडणवीसांवर निशाणा साधला.