मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत. या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेअध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नसतात, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर बोट ठेवले.
भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनातून दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया देताना, “हा धरसोडपणा आहे. तज्ज्ञांना विचारुन हा निर्णय झाला असता तर ही वेळ आली असती. कधीही गोष्ट आणायची, कधीही बंद करायची, त्यावेळी जेव्हा नोटा आणल्या होत्या तेव्हा त्या एटीएममध्येही जात नव्हत्या. म्हणजे नोटा एटीएममध्ये जात आहेत की नाहीत हे देखील पाहिलं नव्हतं. हे असले निर्णय परवडणारे नसतात देशाला. आता लोकांनी परत बँकेमध्ये पैसे टाकायचे, परत तुम्ही नवीन नोटा आणणार, असं सरकार चालतं का? असे प्रयोग होतात का?”
2000 रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याचा भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. मात्र, 2000 रुपयांच्या नोटांचा वापर 30 सप्टेंबरपर्यंत करता येणार आहे. ज्या नागरिकांकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत, अशा नागरिकांना आरबीआयने नोटा बदलून देण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची मुदत दिली आहे. त्याशिवाय, बँकांनाही ग्राहकांना एटीएम अथवा इतर मार्गाने 2000 रुपयांची नोट न देण्याचेही निर्देश दिले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्याचे काम नेतेमंडळी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. 19 ते 21 मे च्या दरम्यान ते नाशिकमध्ये तळ ठोकून असणार आहेत.