पुणे – आळंदीची कार्तिकी एकादशी यात्रा अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपली आहे. कार्तिकी एकादशी यात्रा, माऊलींचा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त 5 डिसेंबरपासून आळंदीत ठिकठिकाणी हरिनाम सप्ताह सुरु होणार आहेत. 9 डिसेंबरला कार्तिकी एकादशी तर 11 डिसेंबरला माऊलींचा (संत ज्ञानेश्वर महाराज) संजीवन समाधी सोहळा आहे. या सोहळ्यासाठी देश-राज्यातील कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येतात. त्यापूर्वीच आज शुक्रवारी (दि. 1 डिसेंबर) इंद्रायणी नदी प्रदूषित पाण्यामुळे पुन्हा फेसाळली आहे. देशात-राज्यात हिंदूत्ववादी सरकार असूनही वारकरी भाविकांच्या भावनांचा विचार का करत नाहीत? इंद्रायणी का प्रदूषण मुक्त करत नाहीत ? वारकऱ्यांच्या आरोग्याची त्यांना काळजी नाही का? असा प्रश्न सर्वसामान्य वारकरी, भाविक विचारत आहेत.
तीर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदीतील प्रदुषण गेल्या अनेक वर्षांपासून वाढत चालले आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील केमीकल कंपन्या, सांडपाणी यामुळे वेळोवेळी इंद्रायणी नदी फेसाळलेली दिसून येते. या पाण्याचा उग्र वास येतो. या पाण्यात अंघोळ केल्यामुळे भाविक, वारकऱ्यांना त्वचारोगासारखे समस्यांना सामोरे जावे लागले. यात्रेदरम्यान तात्त्पुरत्या स्वरूपात जादा पाण्याचा विसर्ग करून इंद्रायणी नदी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला जातो मात्र इतर वेळी भाविक, वारकरी, आळंदीकर ग्रामस्थ यांना या प्रदूषित पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. यात्रेत देखील पाणी सोडण्यास दिरंगाई केली जाते परिणामी भाविकांना प्रदुषित पाण्यातच अंघोळ करावी लागते.
इंद्रायणी प्रदूषण हे काही एका दिवसात झालेले नाही. गेली 10 वर्षांपासून हे प्रदुषण सातत्याने वाढत चालले आहे. कधी-कधी संपूर्ण इंद्रायणी पात्र हिमनदीसारखे पांढरे शुभ्र दिसते. पाण्यावर केमीकलमुळे मोठा फेस झालेला दिसतो. प्रदूषण मंडळाने कारवाई करून इंद्रायणी प्रदूषण मुक्त केली पाहिजे. एसटीपी प्रकल्प उभारून महापालिकेने पाणी शुद्ध करूनच इंद्रायणीत सोडणे अपेक्षित आहे. मात्र अशी कोणतीही कारवाई केली जात नाही. याच प्रदुषणामुळे दरवर्षी इंद्रायणीत जलपर्णी तयार होते. ती काढण्यासाठी कोट्यवधींची टेंडरे काढली जातात मात्र जलपर्णी होऊच नये यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही. सरकारकडून सुरु असलेले इंद्रायणी प्रदूषणाची पाहणी, अभ्यास कधी संपले आणि शुद्ध पाणी मिळेल याची भाविक वारकरी आतुरतेने वाट पाहत आहेत.
हिंदूत्ववादी सरकारच्या काळात वारकऱ्यांच्या हाल-अपेष्टा का?
देशात आणि राज्यात हिंदूत्ववादी विचाराचे सरकार आहे. असे विद्यमान सरकारमधील नेतेमंडळी वेळोवेळी सांगत असतात. पण त्यांना वारकऱ्यांच्या हाल-अपेष्टा दिसत नाहीत का? असा प्रश्न सर्वसामान्य वारकरी भाविक वेळोवेळी उपस्थित करत आहेत.
विकास होतोय पण आरोग्य धोक्यात त्याचे काय?
नक्कीच गेल्या काही वर्षांमध्ये पिंपरी-चिंचवड परिसराचा विकास झाला आहे. हजारो लोकांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या. मात्र विकास होत असताना पर्यावरणाकडे साफ दूर्लक्ष केले जात आहे. इंद्रायणीतील प्रदूषित पाण्यामुळे त्वचारोगाचे गंभीर आजार होत आहेत. जलचर प्राण्यांचे जीव धोक्यात आहेत. त्यामुळे विकास होतोय पण आरोग्य धोक्यात जातेय त्याचे काय असा प्रश्नही सर्वसामान्य उपस्थित करत आहेत.