बंधार्यातून वाहतेय काळेकुट्ट पाणी : स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
चिंबळी – इंद्रायणी नदीत थेट येणारे सांडपाणी, केमिकल मिश्रित पाणी, मैला, नदीपात्रात टाकण्यात येणारा राडारोडा, फोफावलेली जलपर्णी यामुळे इंद्रायणी नदीचा श्वास गुदमरला आहे. त्यातच चिंबळी-मोशी हद्दीतील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्यातून आता थेट काळेकुट्ट पाणी वाहत असल्याने हीच तीन पवित्र इंद्रायणी नदी आहे की गटार आहे, असा प्रश्न अता उपस्थित केला जात आहे.
नदीपात्रातील गाळ, जलपर्णी काढणे, पात्र स्वच्छ करण्याच्या कामावर दरवर्षी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून लाखो रुपयांचा खर्च करण्यात येतो. मात्र, असंख्य वारकर्यांसह नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीची दयनीय स्थिती कायम आहे.
पावसाळा सोडला तर इंद्रायणीचा नदी हा उल्लेख नावापुरताच आहे. सध्या नागरीकरण वाढत असल्याने मोठ्या प्रमाणावर सांडपाणी व मैला कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडला जात आहे. त्यातच पिंपरी-चिंचवड हद्दीतील औद्योगिक वसाहतीतून सांडपाण्यावर प्रक्रिया न करता थेट केमिकल मिश्रीत पाणी नदीत सोडण्यात येत असल्याने नदी कायमच फेसाळलेली असते. तर हेच पाणी अंगावर घेतल्यास नागरिकांना खास सुटत असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
काढलेली जलपर्णी जागेवरच कुजली
चिंबळी-मोशी हद्दीत नदीपात्रास गटाराचे स्वरूप प्राप्त झाले असून, दुर्गंधीही वाढलीआहे. तर नदीपात्रास जलपर्णीचा विळखा कायमच आहे. त्यातच मध्यतरी काढलेली जलपर्णी अद्यापही नदीकिनारीच ठेवली असून ती कुजली असून परिसरात नदीपात्रातील दुर्गंधी अधिकच फोफावली आहे.
राजकारण्यांची आश्वासनेही काळवंडली
नदी स्वच्छतेवर दरवर्षी लाखो रुपये खर्च होतात. तो पैसा जातो कुठे? तसेच प्रत्येकवेळी राजकारण्यांकडून केवळ आश्वासनांची खैरात केली जाते पण नदी काही स्वच्छ होत नसल्याने आश्वासनेही काळवंडली आहेत, अशी प्रतिक्रिया स्थानिकांसह भाविक देत आहेत.