मुंबई – सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून फक्त विरोधी पक्षातील नेत्यांची चौकशी केली जाते, भाजपच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी का केली जात नाही, अशी परखड भूमिका आमदार बच्चू कडू यांनी मांडली. तर त्यांनी भाजपने याचे उत्तर दिले पाहिजे, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
मराठा आरक्षणावरून राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर प्रतिक्रिया देताना प्रसारमाध्यमांना उद्देशून कडू म्हणाले, समाजाला हुशार करण्याची जबाबदारी राजकीय नेत्यांची असते. पण राजकीय नेते चुकले तर प्रसारमाध्यमांनी ताळ्यावर आणले पाहिजे. जे काही सत्य आहे, ते तुम्ही मांडले पाहिजे. यामुळे राजकीय नेते रुसले तर तुमचे काहीच बरं-वाईट होत नाही. तुमच्यामागे ईडीची चौकशीही लागू शकत नाही. ईडी लागणार नाही, अशाप्रकारे काम करत राहा.
ईडीने भाजपाच्या एकाही नेत्याची चौकशी का केली नाही? त्यांनी याचे उत्तर द्यायला हवे. एका सामान्य कार्यकर्त्यालाही हा प्रश्न पडतो. ईडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) किंवा कॉंग्रेसच्या नेत्यांची चौकशी केली जाते. पण भाजपाच्या एकाही नेत्याची चौकशी होत नाही. शिंदे गटाच्या नेत्यांमागे ईडीची चौकशी सुरू होती, पण ते आता सत्तेत आले आहेत, असेही कडू पुढे म्हणाले.