सातारा – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलायला मी वयाने लहान आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाचे अनेक ज्येष्ठ नेते, वडीलधारी राजकीय मंडळी आहेत. गेल्या तीन दशकांत मराठा आरक्षणासाठी ज्येष्ठ राजकीय नेतृत्वाने काय केले, हा प्रश्न विचारायची वेळ आली आहे. मराठा आरक्षणात सातत्याने राजकारण होत असल्याची टीका खा. उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी केली.
सातारा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी मनोज शेंडे यांची निवड झाली. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी खा. उदयनराजे पालिकेत आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मराठा आरक्षणाच्या विषयावर प्रश्न विचारला असता, त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, वेळ आल्यावर मराठा आरक्षणावर मी जाहीररित्या बोलणारच आहे. मराठा आरक्षणाच्या विषयात सातत्याने राजकारण होत असल्याने ते मिळेनासे झाले आहे. माझ्यापेक्षा मोठी, वडीलधारी मंडळी महाराष्ट्रात राजकारणात आहेत. त्यांनी या विषयावर गेल्या 25 वर्षांत आवाज का उठवला नाही, हा प्रश्न आमची पिढी विचारत आहे.
मराठा आरक्षणावर योग्य भूमिका घेतली गेली नाही तर उद्रेक होईल. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य घडविताना जातपात पाहिली नाही. लहानपणीचे मित्र आरक्षणामुळे एकमेकांकडे संशयाने पहात आहेत. मराठा आरक्षणाच्या विषयावर उगाच अहम् ठेवणाऱ्यांच्या वाऱ्यालासुद्धा मी उभा राहणार नाही; पण ही माझी वैयक्तिक मते आहेत. माझ्या मतांवर अनेक मतमतांतरे होणार, हे मला ठाऊक आहे; पण मी जे बोलतो ते आंतरिक तळमळीने बोलतो. लोकांनी आपल्या सोयींसाठी जातीपाती निर्माण केल्या. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभारताना
कधी जातीपातींचा विचार केला नाही. राजस्थान, झारखंड, गुजरात या राज्यांनी आर्थिक उन्नती योजनेचा लाभ लोकांना दिला. मराठा आरक्षणावर बोलायला मी लहान आहे. राजकारणातील ज्येष्ठ नेतेमंडळीनी मराठा आरक्षणावर भूमिका का मांडली नाही? तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी 1989 साली मंडल आयोगाच्या शिफारशी अंमलात आणल्या. मग, त्याच वेळी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय का पुढे आला नाही? मराठा आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे गेल्याने मराठा समाजात तीव्र नाराजी आहे. मराठा आरक्षणात राजकारण केले जात असल्याने ते प्रत्यक्षात लागू होण्यामध्ये अडचणी येत आहेत. आरक्षण दिले नाही तर मराठा समाजात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.