कराड -करोना महामारीने त्रासलेल्या लोकांना दिवाळीच्या तोंडावर करोनाने दिलासा दिला आहे. गेल्या आठ महिन्यांपासून असलेले करोनाचे सावट आता कमी झाले आहे. त्यामुळे दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी लोक सरसावले आहेत. करोनाचा कहर कमी झाल्याने संपूर्ण बाजारपेठ पूर्णक्षमतेने सुरू झाली आहे. धार्मिक स्थळे व शाळांना अजूनही कुलूप बंद आहेत.
मात्र, येत्या शनिवारी दिपावलीचे पहिले अभ्यंग स्नान होणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकांनी फराळाचे साहित्य तसेच विविध वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली असून दिवाळी साहित्य विक्रेत्यांनी बाजारपेठ फुलून गेली आहे.
उत्सव प्रकाशाचा म्हणून दिवाळीकडे पाहिले जाते. हा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. तर महाभयंकर करोना महामारीचे संक्रमनही कमी झाल्याने दिवाळी उत्साहात साजरी करण्यासाठी सर्वजण उत्साही असल्याचे दिसून येत आहे.