मुंबई – देशात अनेक राज्यात लसीचा तुटवडा जाणवत असल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे. यामुळे वारंवार करोना लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागत आहे. लसीचा तुटवडाच्या मुद्यावरून सध्या केंद्र – राज्य सरकारांमध्ये शाब्दिक चकमक होतांना दिसून येत आहे. तर दुसरीकडे लसीकरणाचा वेग मंदावल्यामुळे लस घेण्याच्या प्रतिक्षेत असलेले नागरिक हैराण झाले आहेत.
यातच राजस्थानामध्येही कोरोना लसींची कमतरतेमुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. राज्य सरकारने केलेल्या लसीच्या मागणीवर राजस्थान भाजपचे विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी अजब विधान केले आहे.
ते म्हणाले,कोरोना विरोधी लस काही झाडाला लागलेल्या नाहीत की केंद्र सरकार हव्या तितक्या तोडून देऊ शकेल, असं वादग्रस्त वक्तव्य कटारिया यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे सध्या सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे.
दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी वांरवार केंद्रावर लसीकरण तुटवड्यावरून निशाणा साधला आहे. भाजपाकडून सातत्यानं राज्यात लसीकरणाचं काँग्रेसीकरण केलं जात असल्याचा आरोप केला जात आहे.