पुणे- अकरावी प्रवेशासाठी “सीईटी’ आवश्यक आहे. त्याची कार्यवाही राज्य शिक्षण मंडळाकडून सुरू आहे. मात्र, “सीईटी’ची कार्यवाही पूर्ण होत नाही, तोपर्यंत अकरावीमध्ये प्रवेश देता येणार नाही आणि कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रिया सुरू करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश माध्यमिक शिक्षण विभागाने काढले आहे. त्यामुळे “सीईटी’पूर्वी अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू करणाऱ्या महाविद्यालयांना पायबंद बसणार आहे.
याबाबतचे परिपत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी काढले. अकरावी “सीईटी’ची कार्यवाही सुरू असताना काही महाविद्यालये प्रवेश प्रक्रिया राबवित असल्याचे निदर्शनास आले. एकीकडे “सीईटी’ची प्रक्रिया सुरू आहे, तर दुसरीकडे परस्पर काही महाविद्यालये प्रवेश प्रक्रिया राबवित आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचा गोंधळ उडाला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार “सीईटी’ची कार्यवाही पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणत्याही महाविद्यालयांना अकरावी प्रवेश सुरू करता येणार नसल्याचे झाले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावीची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर सुधारित मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला. त्याचदरम्यान राज्य सरकारने अकरावी प्रवेशासाठी संपूर्ण एक सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) लागू करण्यात आलेली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व बोर्डांच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एकच “सीईटी’ होणार आहे. दरम्यान, ही “सीईटी’ विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक आहे. परंतु, अकरावी प्रवेश देताना “सीईटी’ दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात येतील आणि अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यानंतर उर्वरित जागांवर अन्य विद्यार्थ्यांना दहावी मूल्यमापन पद्धतीनुसार प्राप्त गुणांच्या आधारे प्रवेश दिले जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
“सीईटी’नंतर राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत कार्यपद्धतीने स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. मात्र, तोपर्यंत कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयांना अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू करता येणार नाही, याकडे माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी लक्ष वेधले आहे.