Pragya Singh Thakur – भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर यांचे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तिकिट कापल्यानंतर त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्यांना उमेदवारी का नाकारण्यात आली याचीच मध्य प्रदेशमध्ये चर्चा असून माध्यमेही यावरून प्रज्ञासिंह यांचा पाठपुरावा करत असल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एका वाहिनीशी बोलताना प्रज्ञासिंंह ठाकुर म्हणाल्या की मी प्रसारमाध्यमांना हात जोडून विनंती करते. मी जे काही बोलते त्यात ते फेरफार करून दाखवतात. जे काही मी बोलले आहे किंवा बोलते ते काहीच नंतर वाहिन्यांवर दिसत नाही. मला बदनाम करून तुम्हाला काहीच कमावता येणार नाही. जेवढी काही टीआरपी मिळवायची तेवढी तुम्ही गेल्या पाच वर्षांत मिळवली. मी माझ्या सिध्दांतांवर चालते. मी एक संन्यासी आहे. | Pragya Singh Thakur
मध्य प्रदेशातील २९ पैकी २४ जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आहे.भाजपने काही खासदारांचे तिकीट कापले आहे तर काहींना पुन्हा संधी देण्यात आली आहे. भोपाळमध्ये प्रज्ञासिंह ठाकुर यांच्याऐवजी माजी महापौर आलोक शर्मा यांना संधी देण्यात आली आहे. प्रज्ञा यांची उमेदवारी जाण्याचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्यावरची नाराजी असल्याचे म्हटले जाते आहे. | Pragya Singh Thakur
प्रज्ञासिंह यांनी अनेक वेळा नथुराम गोडसे यांचा देशभक्त असा उल्लेख केला होता. त्यामुळे मोदी नाराज होते असे म्हणतात. आपण त्यांना मनापासून माफ करू शकणार नाही असेही मोदी म्हणाले होते. स्वत: प्रज्ञा यांनीही याची कबुली दिली आहे. माझे काही शब्द पंतप्रधानांना आवडले नाहीत असे त्यांनीही मान्य केले. तसेच उमेदवारी देणे अथवा न देणे हा पक्षसंघटनेचा निर्णय असतो. ते कापले गेले, का कापले गेले असे प्रश्न विचारायचे नसतात. मी अगोदरही तिकिट मागितले नव्हते आणि आताही मागितले नाही असे प्रज्ञा यांनी सांगितले. मला माफ करणार नाहीत असे ते म्हणाले होते. माझे काही शब्द त्यांना खटकले होते. मात्र त्याची मी अगोदरच माफी मागितली होती. | Pragya Singh Thakur