Sanjay Raut: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या (शिखर बँक) कथित 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी तपास बंद करण्याचा अर्ज मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दिला आहे. या घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही आरोप झालेले होते. या निर्णयानंतर विरोधकांच्या विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. यातच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी या घोटाळ्याप्रकरणात देवेंद्र फडणवीस, जे. पी. नड्डा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
“फडणवीसांनी उत्तर द्यायला पाहिजे”
संजय राऊत म्हणाले की, “अजित पवार यांच्यावर आरोप असलेला ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा, २५ हजार कोटींचा शिखर बँकेचा घोटाळा यावर फडणवीस यांनी उत्तर द्यायला पाहिजे. या घोटाळ्यांच्या प्रश्नावर फडणवीसांची जीभ अडखळत असेल तर हाच प्रश्न भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांना विचारला पाहिजे. त्यांनी सुद्धा या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं पाहिजे.”
“देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते. नवाब मलिक यांच्या बाजूला आम्ही अजित पवार यांनाही तुरुंगात पाठवू असे फडणवीस सांगत होते. देवेंद्र फडणवीस हेच अजित पवार यांना चक्की पिसिंग, चक्की पिसिंग करायला लावणार होते, फडणवीस लोकांशी खोटं बोलत आहेत. देशाशी, राज्याशी ते खोटं बोलत आहेत,” अशी टीकाही राऊत यांनी केली.
15 मार्च रोजी सुनावणी
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात ‘सी’ समरी सादर केली असून न्यायालयात याप्रकरणी 15 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. सुनावणीच्या दिवशी तो न्यायालयासमोर येईल. चुकीच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात येतो किंवा गुन्हा दिवाणी स्वरुपाचा असतो. तेव्हा पोलीस सी समरी अहवाल न्यायालयात दाखल करतात. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने अजित पवार यांच्याविरोधात काही ठोस पुरावे सापडले नसल्याचा निष्कर्ष काढला आहे.