मुंबई – राज्यात एकीकडे सीमावाद आणि महापुरुषांबाबतच्या आक्षेपार्ह विधानांवरुन वातावरण तापलेले असताना उद्या केंद्रीय निवडणूक आयोगासमोर महत्वाच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे फडणवीस सरकार आले होते. शिवसेनेत पडलेली उभी फूट अवघ्या राज्यासह देशाने पाहिली. त्याच अनुषंगाने आता निवडणूक आयोगासमोरची लढाई सुरु होणार आहे.
ठाकरे आणि शिंदे गटाकडून सर्व कागदपत्रांची पूर्तता निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या होणारी सुनावणी राज्यासाठी खूप महत्वाची आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांना धनुष्यबाण चिन्हा ऐवजी मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी लागली होती. तसेच शिवसेना हे नाव देखील वापरता आले नव्हते. त्यानंतर न्यायालयाने पक्षाबाबतचे सर्व अधिकार निवडणूक आयोगाकडे असल्याचे म्हणत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.
त्याच अनुषंगाने उद्या निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. शिवसेना हे नाव राहणार का ? धनुष्यबाण चिन्ह पुन्हा मिळणार का ? ठाकरे गटासाठी ही अस्तित्वाची लढाई असणार आहे. म्हणून उद्या होणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही सुनावणी ठाकरे गटासाठी महत्वाची असणार आहे.