भाव पडल्याने शेतकरी हवालदिल ः प्रतिकिलो 20 ते 30 रुपये दर
शिरूर – कांद्यांचे भाव गडगडल्याने शिरूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला. कांद्याचे भाव पाडण्यात नक्की कोणाचा हात आहे? शासनाचा की व्यापाऱ्यांचा तर नाही? हे गौडबंगाल समजणे कठीण झाले आहे. सध्या कांद्याचा प्रतिकिलो भाव 20 ते 30 रुपये आहे.
मागील तीन-चार महिन्यात कांद्यांचे भाव गगणाला भिडले होते. त्यावेळेस शेतकऱ्यांकडे कांदा उपलब्ध नव्हता. त्यावेळी कांद्यांचे भावाने शंभरी पार केली होती. ज्या शेतकऱ्यांकडे कांदा होता, त्यांना भरपूर पैसा मिळाला. कांद्याचा वाढलेला भाव पाहून शेतकरी वर्गाने कांदा लागवड केली. पण पावसाने खरिप, रब्बी हंगाम ओला केला. बाजारात कांद्यांचे भाव गगनाला भिडले होते.
शंभर दीडशे दोनशे रुपये किलो भाव कांद्याला मिळत असल्याने शेतकऱ्यांनी यातून पैसे मिळतील. यामुळे कांदा मोठ्या प्रमाणात कांद्यांची लागवड केली आणि कांद्यांचे उत्पादन घेतले. त्यामुळे बाजारपेठांमध्ये कांद्यांची आवक वाढून भाव अचानक गडगडले. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे.
भाव वाढीवर कोणाचे नाही नियंत्रण
कांद्यांचे गणित आणि भावाचे बेरीज-वजाबाकी करण्यासाठी व्यापारी आणि शासन यांचे मोठे षड्यंत्र असल्याचे बोलले जाते. ज्यावेळी शेतकरी वर्गाकडे कांदा उपलब्ध होतो. त्यावेळेस व्यापारी त्यांच्याकडून कमी भावात कांदा खरेदी करून तो साठवला जातो. आणि शेतकरी यांच्याकडील कांदा संपला असता त्यावेळी भाव वाढवला जातो आणि तो चढ्या भावाने विकला जातो. यावर शासनाच्या कुठल्याही खात्याचे नियंत्रण नसल्याचे दिसून येते आणि त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो.
शेतकऱ्यांचे होते आर्थिक नुकसान
कांद्याच्या भाव वाढीचे चक्र दरवर्षी असेच पाहावयास मिळत आहे, परंतु शेतकरी वर्गाला कांदा साथ देईल असे वाटत असताना व्यापारी व शासन यांच्या अंतर्गत खेळी मुळेच कांद्याचे उत्पादन आल्यानंतर भाव कमी करण्यात येतात. याला जबाबदार कोण? व्यापारी साठवणूक करून तर शासन व्यापाऱ्यांना पाठीशी घालत असल्यानेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळतो. त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले.