मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाविषयी केलेल्या वक्तव्याने राज्यात एकच गोंधळ उडाला आहे.सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक उडत आहे. त्याच्या आता खासदार उदयनराजे भोसले यांनीदेखील राऊतांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. “जे कोण चोरमंडळ म्हणाले असतील त्यांनी आरशासमोर तेच म्हणावे, म्हणजे त्यांना त्यांच्या प्रतिबिंबाचे उत्तर आपोआप मिळेल, असा खोचक टोला उदयनराजे भोसले यांनी राऊत यांचे नाव न घेता लगावला.
शिवगर्जना मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर खोचक शब्दात टीका केली. विधिमंडळ (संसदीय) पक्ष म्हणजे शिवसेना नव्हे, अशा शब्दात शिंदे गटावर निशाणा साधत खासदार राऊत यांनी राज्यात सध्या विधिमंडळ नसून चाळीस जणांचे चोरमंडळ आहे, असा टोला लगावला होता.
याबाबत खासदार उदयनराजे भोसले साताऱ्यात माध्यमांशी बोलताना म्हणाले, जे कोण चोरमंडळ म्हणाले असतील त्यांनी आरशासमोर तेच म्हणावे. म्हणजे त्यांना त्यांच्या प्रतिबिंबाचे उत्तर आपोआप मिळेल, आरसा हा सगळ्यांना लागू होतो. या पृथ्वीवर कोणीही नाही की त्याला तो लागू होत नाही असेही खासदार उदयनराजे म्हणाले.
दरम्यान, राऊत यांनी विधिमंडळातील पक्ष म्हणजेच शिवसेना असे काही जण म्हणत असतील ते खोटे आहे. ते तर बनावट शिवसैनिक आहेत. विधिमंडळात या बनावट शिवसेना आमदारांच्या रूपाने चाळीस चोरांचे मंडळ आहे. या लोकांनी आपण कितीही शिवसेना असल्याचा आव आणला तर राज्यातील जनता त्यांना स्वीकारणार नाही, त्यांनी आम्हाला पदावरून काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. कारण अशी अनेक पद आम्हाला पक्षाने आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहेत. ती पदे आम्ही अशी ओवाळून टाकतो. पदे गेली तर परत येतील. पण आम्हाला आमचा पक्ष महत्त्वाचा आहे, असे राऊत म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्याचा समाचार उदयनराजेंनी घेतला.