सिंहगडरस्ता -धायरी परिसरात संचलित सहा अंगणवाड्या आहेत. सर्वसामान्य कुटुंबांतील 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी ही शिक्षण आणि आरोग्याची व्यवस्था शासन करते. धायरी गाव हे महानगरपालिकेमध्ये पाच वर्षांपूर्वी समाविष्ट झाल्यापासून या अंगणवाड्यांची सध्या दुरवस्था झाल्याचे चित्र समोर येत आहे.
धायरीतील सहा अंगणवाड्यांना वीज बिल न भरल्यामुळे महावितरणने मीटर काढून दिले आहे. त्यातील दोन अंगणवाड्या अजूनही अंधारातच आहेत आणि चार अंगणवाड्यांना समाजाकडून अनेक वर्षापासून वीज पुरवली जाते. धायरीतील या सहा अंगणवाड्यांना कायमस्वरुपी वीज आणि त्या बिलाची तरतूद जिल्हा परिषदेने, महानगरपालिकेने तातडीने करावे अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे सारंग बाळासाहेब नवले यांनी केली आहे.
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना नवले म्हणाले, “अंगणवाड्यांची अवस्था बघितल्यावर वाईट वाटले. संबंधित अधिकारी या प्रश्नावर केव्हा आवाज उठवतील? आपल्या पुढच्या पिढीला आपण असेच शिक्षण देणार आहोत का?, यावर विचार करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने या चिमुकल्यांसाठी का अनास्था दाखवली,’ असेही नवले म्हणाले.
धायरी ग्रामपंचायत या अंगणवाड्यांचे वीज बिल भरत होती. परंतु गावे समाविष्ट झाल्यामुळे आणि ही अंगणवाडी महानगरपालिकेकडे वर्ग न झाल्यामुळे बिलाचा प्रश्न रखडला आहे. समाजातील दानशूर व्यक्तींना आवाहन करून आम्ही चार अंगणवाड्यांची वीज सुरळीत केली आहे. दोन अंगणवाड्याचांही वीज पुरवठा लवकरच सुरू होईल.
– भूषण जोशी, गटविकास अधिकारी