नवी दिल्ली – मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तिसगढ या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या (रविवार) जाहीर होणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीआधीची राजकीय सेमी-फायनल मानल्या गेलेल्या त्या निवडणुकांत कोण बाजी मारणार याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. विधानसभा निवडणुकांमुळे प्रामुख्याने पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या भाजप आणि कॉंग्रेस या राष्ट्रीय पक्षांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यातून संपूर्ण देशाचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे.
निकालासाठी सज्ज झालेल्या चारपैकी राजस्थान आणि छत्तिसगढ या दोन राज्यांत कॉंग्रेसची सत्ता आहे. तर, भाजप (मध्यप्रदेश) आणि भारत राष्ट्र समिती (तेलंगणा) प्रत्येकी एका राज्यात सत्तेवर आहेत. साहजिकच, तिन्ही पक्षांच्या दृष्टीने निकाल अतिशय कळीचे ठरणार आहेत. प्रत्यक्ष निकालांआधी विविध मतदानोत्तर चाचण्यांनी त्यांचे अंदाज जाहीर केले. त्यामध्ये बरीच तफावत आहे. त्यामुळे मतदानोत्तर चाचण्यांचाही कस लागणार आहे. रविवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर दुपारच्या सुमारास चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होऊ शकेल.
केंद्र सरकारचे नेतृत्व करणारा भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष असणारा कॉंग्रेस या पक्षांच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. भाजपच्या दृष्टीने मध्यप्रदेशातील सत्ता राखण्याला सर्वांधिक महत्व आहे. त्या राज्यात भाजपसमोर कॉंग्रेसने तगडे आव्हान उभे केल्याचे मानले जाते. मध्यप्रदेशात विधानसभेच्या एकूण २३० जागा आहेत. विधानसभेच्या २०० जागा असलेल्या (प्रत्यक्ष निवडणूक १९९ जागांसाठी) राजस्थानात दर पाच वर्षांनी कॉंग्रेस आणि भाजपला आलटून-पालटून सत्ता मिळते. मागील ३० वर्षांपासूनची ती प्रथा कायम राहणार की बदलणार याचे उत्तर निकालातून मिळेल.
छत्तिसगढमध्ये विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. त्या राज्यात कॉंग्रेस आणि भाजप यांच्यातच थेट लढत अपेक्षित आहे. तेलंगणात सत्तारूढ भारत राष्ट्र समितीला कॉंग्रेस कडवी लढत देणार असल्याचे निवडणूक काळात समोर आले. त्या राज्यात भाजप कुठला चमत्कार करणार का याविषयी कुतूहल आहे. विधानसभा निवडणुकांत इतर पक्ष कशी कामगिरी करतात हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. चार राज्यांतील मतदार स्पष्ट कौल देणार की त्रिशंकू स्थिती उद्भवणार ते निकालांतून समोर येईल.