मंचर – मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदासाठी कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीच्या वतीने सभापतिपदासाठी वसंतराव भालेराव, शिवाजीराव ढोबळे, तर उपसभापतीपदासाठी नीलेश थोरात किंवा महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा म्हणून जे. के. थोरात यांची नावे चर्चेत आहे.
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने 18 पैकी 17 जागा जिंकून भाजप-शिवसेना पॅनलचा पराभव केला, तसेच राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार देवदत्त निकम हे एकमेव निवडून आले. येथे राष्ट्रवादी अर्थात महाविकास आघाडीचे निर्विवाद बहुमत आहे. सभापतिपदासाठी अनेक नावे चर्चेत आहे.
बाजार समितीचे माजी सभापती आणि पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव भालेराव गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीापासून अलिप्त होते. त्यांनी भाजपमध्ये काही दिवस काम केले; परंतु त्यानंतर राष्ट्रवादीच्या विविध कार्यक्रमांना, तसेच निवडणुकीमध्येही सक्रीय झाले. यामुळे त्यांना सभापतिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. सभापतिपदासाठी दावेदार असणारे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव ढोबळे यांनीही राष्ट्रवादीची फारकत घेऊन शिवसेनेत प्रवेश केला; परंतु तेथे ते रमले नाही.
त्यानंतर ते शिवसेनेच्या कार्यक्रमांनाही अनुपस्थित राहत होते. गेल्या काही वर्षापासून राष्ट्रवादीच्या विविध कार्यक्रमांना त्यांनी उपस्थिती लावून पक्षाचे काम केले आहे. राष्ट्रवादी युवकचे माजी अध्यक्ष नीलेश थोरात यांनीही युवक अध्यक्ष असताना पक्ष संघटना बांधणी करून उत्तम पक्ष संघटन केले होते. याचा विचार करून भालेराव, ढोबळे, थोरात यांना राष्ट्रवादीने मंचर बाजार समितीच्या संचालक पदासाठी उमेदवारी देऊन ते विजयी झाले.
नीलेश थोरात हेही सभापती पदासाठी इच्छुक आहे. सभापती पद त्यांना मिळाले नाहीतर उपसभापती पदासाठी त्यांचा विचार होऊ शकतो, अशीहू चर्चा आहे. कॉंग्रेसच्या वतीने निवडून आलेले लाला अर्बन बॅंकेचे संचालक जे. के थोरात यांचेही नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादीला सभापती पद दिले तर उपसभापती पद कॉंग्रेस अथवा शिवसेनेला मिळावे, यासाठी येथील महाविकास आघाडीचे स्थानिक नेते प्रयत्नशील आहेत. शिवसेनेच्या मयुरी भोर निवडून आल्या आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीचा फॉर्मुला काय ठरतो, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
देवदत्त निकम यांचे पुनर्वसन होणार कर?
बाजार समितीचे माजी सभापती आणि बंडखोर म्हणून निवडून आलेले देवदत्त निकम यांनीही माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे समजते. यासाठी व्यूहरचना आखली आहे, त्यामुळे त्यांचे पुन्हा पुनर्वसन होणार का याकडेही तालुक्याचे लक्ष लागले आहे. भीमाशंकर साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर देवदत्त निकम यांचा बाजार समितीच्या निवडणुकीत संचालक म्हणून निवडून आल्याबद्दल सत्कार केला. त्यामुळे देवदत्त निकम यांना पुन्हा बाजार समितीच्या सभापती पदासाठी संधी देणार का, याकडे लक्ष लागले आहे.
निकमांबाबत राष्ट्रवादीची सावध भूमिका
भविष्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. त्यानंतर विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे देवदत्त निकम यांना न दुखवता किंवा पदाची संधी न देता सामंजसपणा करून त्यांच्याशी संबंध ठेवून भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत डोकेदुखी नको म्हणून राष्ट्रवादी जपून पाऊल टाकत असल्याचे दिसून येते. त्यामुळे बंडखोरी करूनही त्यांच्यावर कोणतीच कारवाई पक्षाने केली नाही .त्यामुळे त्यांना न दुखवता टप्प्याटप्प्याने होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी जपून पावले टाकून पक्षाचे नुकसान होणार नाही, याकडेही लक्ष दिले जात आहे.