हेमंत देसाई
महाराष्ट्रात एकूण मृत्यूंच्या संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त मृत्यू केवळ मुंबईतील आहेत. त्यामुळे केवळ बड्या लोकांच्या आजाराकडे लक्ष देऊन चालणार नाही, तर खासकरून गोरगरिबांना आणीबाणीच्या वेळी तातडीने उपचार मिळण्याची सोय झाली पाहिजे.
महानायक अमिताभ बच्चन, त्यांचे चिरंजीव अभिषेक, सूनबाई ऐश्वर्या आणि नात आराध्या यांना करोनाची बाधा झाल्यामुळे केवळ मुंबईतच नव्हे, तर देशभर तोच चर्चेचा विषय झाला. खुद्द अमिताभ यांनीच ट्विटरच्या माध्यमातून आपल्या आजाराची माहिती दिली आणि ते स्वतःच चाचणी करून नानावटी इस्पितळात दाखल झाले.
मात्र, ही बातमी पसरताच, देशभर ठिकठिकाणी अमिताभ यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्या जाऊ लागल्या. काहीजणांनी यज्ञ केले, पूजाअर्चा केल्या. अमिताभ यांना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी आपल्या सर्वांचीच इच्छा आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच महापौर किशोरी पेडणेकर त्याचप्रमाणे पालिकेच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी महानायकाच्या आरोग्याबद्दलची माहिती तत्परतेने देण्यास सुरुवात केली.
पालिका कर्मचाऱ्यांचा ताफा त्यांचे तिन्ही बंगले सॅनिटाइज करण्यासाठी गेला. त्यांच्यासमवेत पालिकेचे ज्येष्ठ अधिकारी तेथे दाखल झाले. प्रसारमाध्यमांनी तर सकाळपासून इस्पितळासमोर तळच ठोकला. प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या कुटुंबीयांनाही करोनाची बाधा झाली आहे. तसेच अभिनेत्री रेखा हिच्या सुरक्षा कर्मचाऱ्यास करोनाची लागण झाल्यामुळे तिचा बंगला सील करण्यात आला आहे.
चित्रपट अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याबद्दल चुकीची बातमी पसरल्यामुळे त्यांनाही एक व्हिडीओ जारी करून लोकांचा गैरसमज दूर करावा लागला. सेलिब्रिटींचा आजार हा अर्थातच अधिक महत्त्वाचा ठरतो आणि माध्यमे त्यांच्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करतात. सेलिब्रिटीजविषयीच्या बातम्यांना वृत्तमूल्य अधिक असते, कारण लोकांना त्यांच्या जीवनात रस असतो, हे सर्व खरे आहे; परंतु त्याचवेळी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना माध्यमात एवढी जागा मिळत नाही आणि गोरगरीब करोनाबाधितांकडे लक्ष देण्यास सरकारी यंत्रणांना वेळही नसतो, हेही नाकारता येणार नाही.
त्यातल्या त्यात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे, करोनाबाधितांचा रिकव्हरी रेट, म्हणजेच बरे होण्याचे प्रमाण मोठे आहे. परंतु सीएफआर किंवा केस फेटॅलिटी रेट हा 4.15 टक्के आहे. देशाची राष्ट्रीय सरासरी 2.72 टक्के आहे. ही अत्यंत चिंताजनक अशी बाब आहे. तसेच जी सॅंपल्स घेण्यात येतात, त्यापैकी 19 टक्के पॉझिटिव्ह रेट आहे. हे प्रमाणही मोठे आहे. तसेच वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये कोविडचा संसर्ग वाढत चालला असून, त्यामुळे स्थानिक प्रशासनांना पुन्हा एकदा टाळेबंदी जाहीर करावी लागत आहे.
पुणे-ठाण्यासह मुंबईतील उपनगरांत जारी करण्यात आलेल्या कठोर निर्बंधांना विरोध सुरू झाला आहे. पुण्यात जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीबाबत आम्हाला विश्वासातही घेण्यात आले नाही, अशी स्पष्ट नाराजी भाजप खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केली आहे. उलट सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात आला, असे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
ठाणे शहरातील टाळेबंदीची मुदत वाढवण्याच्या निर्णयाविरुद्ध “चेंज डॉट ऑर्ग’ या डिजिटल मंचावर नागरिकांच्या पाठिंब्यासाठी ऑनलाइन याचिका करण्यात आली. दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील शहरी परिसरात टाळेबंदीबाबत अजित पवारांनी आग्रह धरल्याने, ठाणे जिल्ह्यात टाळेबंदीला विरोध करण्याची भूमिका गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मागे घेतली.
विशेष म्हणजे, ठाणे जिल्ह्यात भिवंडी, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येथील रुग्णसंख्याही पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. नाशिकमध्ये जिल्हा प्रशासन आणि महापालिकेत समन्वयाचा अभाव असून, निर्बंध सैल करताना सुसूत्रता दिसून येत नाही. अंमलबजावणी करताना नियमांत सारखे बदल केले जात आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय विभागात मतभेद निर्माण झाल्यामुळे करोनावर नियंत्रण मिळवणे कठीण होत असल्याच्या बातम्या आहेत. धक्कादायक बाब अशी की, टाळेबंदीत थांबलेले लग्नसोहळे आता जोमाने सुरू झाल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात महामारीचे थैमान सुरू झाले आहे. उत्तर महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या 14 हजारांचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे.
कोकणात गणेशोत्सव अधिक जल्लोषात साजरा केला जातो. चाकरमानी मंडळी मोठ्या प्रमाणावर आपापल्या गावी येतात; परंतु यावेळी त्यांना काही निर्बंधांना तोंड द्यावे लागणार आहे. सरकारने आपली भूमिका जाहीर करताच, माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि त्यांच्या चिरंजीवांनी यास विरोध सुरू केला. सवंग लोकप्रियतेसाठी बेजबाबदारपणाची भूमिका राजकीय नेते कशी घेतात, याचे हे उदाहरणच आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ठिकठिकाणी जाऊन करोनाच्या समस्यांची माहिती करून घेत आहेत. परंतु पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी या गोष्टीची संभावना “हेल्थ टूरिझम’ या शब्दांत केली. ही टीका संपूर्णपणे चुकीची व अन्यायकारक म्हणावी लागेल. भारत करोनाच्या बाबतीत आज जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी यासाठी मोदी सरकारला दोषी ठरवले आहे. मात्र, देशात सर्वाधिक महामारी महाराष्ट्रात आहे, त्याचा दोष कोणाकडे जातो? तेव्हा महाविकास आघाडी सरकारने सेलिब्रिटीज व श्रीमंतापेक्षा सामान्य जनतेच्या आरोग्याची अधिक काळजी केली पाहिजे, एवढीच अपेक्षा.