सातारा – माढा लोकसभेचा खासदार, माण विधानसभेचा आमदार कोण पाहिजे हे त्या कार्यक्षेत्रातील मतदारराजा ठरवेल. हे निर्णय घेणारे रामराजे आहेत तरी कोण? असा घणाघात भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी केला. दरम्यान दुष्काळी माण तालुक्यावर शरद पवार आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे तत्कालिन अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांनीच अन्याय केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, अविनाश कदम, सुनील काटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
रामराजेंनी आम्हाला जे नको आहेत, त्यांना बाजूला ठेवणार आहे अशी टीका पत्रकार परिषदेत केली असल्याबाबत तुमचे मत काय? असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर आ. गोरे म्हणाले, ते ठरवणारे कोण? आम्ही त्यांच्या छातीवर बसून तीन टर्म आमदार झालो आहे. माढा लोकसभा आणि माण विधानसभा मतदारसंघातील जनता कोणाला खासदार आणि कोणाला आमदार करायचे, हे ठरवेल. मैदानात लढताना आम्ही समोर विरोधक कोण आहे हे ठरवून लढत नसतो. कोणीही आमच्या विरोधात असला तरी, आम्ही त्याला आस्मान दाखवतोच.
गोरे पुढे म्हणाले, आजपर्यंत दुष्काळी माण तालक्याला दुष्काळीच ठेवण्याचं काम शरद पवार आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे. आजपर्यंत या दुष्काळी तालुक्यांचा केवळ वापरच झाला. त्यांचेच भाग त्यांनी सिंचनाखाली आणून त्यांच्या बागायती पट्टयांसाठी दुष्काळी भागातील टोळ्या कशा नेता येतील अशी व्यवस्था करण्यासाठीच रामराजे यांनी माण व खटाव तालुक्याला पाणी मिळून दिले नाही.
धरणाच्या फेर पाणी वाटपाचा देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय धाडसी आहे. जिहे कठापूर, उरमोडी, टेंभू, वसना वांगणा या धरणांमधून न वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा फेरआढावा घेऊन तेरा टीएमसी पाणी दुष्काळी माण- खटाव तालुक्यासह सांगली व सोलापूरच्या दुष्काळी भागाला देण्याचे नियोजन आहे. याची सुधारीत प्रशासकीय मान्यता घेतली जाणार आहे.