नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर एका मुलीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ही मुलगी चक्क मनुस्मृती जाळून सिगारेट पेटवत आहे तसेच मांसाहार देखील शिजवत आहे. दरम्यान, या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलीचे नाव प्रिया दास असे आहे. ती बिहार शेखपुरामधली राहणारी आहे.मात्र ही प्रिया दास आहे कोण आणि तिने हे कृत्य का केले ? असा सवाल सध्या निर्माण होत आहे.
२७ वर्षीय प्रिया दास राष्ट्रीय जनता दलच्या महिला शाखेची प्रदेश सचिव आहे. प्रिया दास चर्चेत येणाचे कारण तिचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत प्रिया दास ही मनुस्मृती जाळून त्यावर सिगारेट पेटवताना दिसत आहे. प्रिया दास सांगते की, मी ५०० रूपये खर्च करून मनुस्मृती घेतली. या मनुस्मृतीत असे लिहिले आहे की जर महिलांनी मद्यपान केलं किंवा धूम्रपान केलं तर त्यांना अनेक प्रकारच्या शिक्षा होऊ शकतात. तसंच हा न्याय कुणाच्या बाबतीत करायचा आहे? म्हणजेच कुठल्या जातीच्या व्यक्तीला शिक्षा करायची आहे ते देखील मनुस्मृतीत लिहिले आहे. जातीप्रमाणे शिक्षा काय आहेत त्या ठरवण्यात आल्या आहेत ते मला मुळीच पटलं नाही त्यामुळे मी मनुस्मती जाळली आणि त्यावर सिगारेट पेटवली तसेच ते जाळून त्यावर चिकनही शिजवले असे प्रिया दासने सांगितले.
प्रिया दासने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितले की माझा व्हिडिओ ट्विटरसह इतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही लाख लोकांनी माझा हा व्हिडिओ पाहिला आहे. तसंच शेकडो लोकांनी माझं मनुस्मृती जाळणं हे गैर आणि साफ चुकीचं असल्याचंही म्हटलं आहे. तसंच माझ्या सिगारेट पेटवण्याचा आणि चिकन शिजवण्याचाही अनेकांनी निषेध नोंदवला आहे. अशात एक गोष्ट सांगते की, मी सिगारेटही पित नाही आणि नॉनव्हेजही खात नाही. मनुस्मृतीला माझा विरोध दर्शवण्यासाठी आणि व्हिडिओ शूट करायचा होता म्हणून मी तसं वर्तन केलं असेही प्रियाने सांगितले आहे.
राजकारण हा विषय प्रिया अभ्यासते आहे त्याचसोबत ती शिक्षिका होण्याच्याही प्रयत्नात आहे. आता ती पीएचडीही करण्याचा प्रयत्न करते आहे. मी एक दलित कार्यकर्ती आहे. प्रिया म्हणते मी व्हिडिओत मनुस्मृती जाळताना दिसते आहे. मात्र या गोष्टीचा पाया बाबासाहेब आंबेडकरांनी रचला होता. मनुस्मृती जाळणं हा कुठल्याही व्यक्तीचा अपमान करणं नाही तर गलिच्छ आणि किळसवाणा जातीयवाद, ढोंगी विचार या सगळ्यांचा निषेध नोंदवणं हेच मला पटलं म्हणून मी तसं वर्तन केलं असेही प्रिया दासने सांगितले. प्रिया दास सांगते ही तर एक सुरूवात आहे. अशा प्रकारची पुस्तकं नष्टच केली पाहिजेत. मनुस्मृती हे काही असं पुस्तक नाही जे वाचून तुमचं ज्ञान वाढेल. हे पुस्तक लोकांमध्ये उच्च-नीच, भेदभाव, लोकांना वाटण्याचं काम करणारं आहे त्यामुळेच मी ते जाळलं असंही प्रिया दास सांगते.
प्रिया दास म्हणाली की मनुस्मृती या पुस्तकात महिलांबाबत अशा गोष्टी लिहिल्या आहेत ज्या अयोग्य आहेत. प्रिया या दरम्यान हा दावाही केला आहे की समाजात जेवढ्या कुप्रथा आहेत त्याचं मूळ मनुस्मृती आहे. महिलांशी संबंधित प्रथा असतील किंवा लग्नाशी संबंधित असलेल्या प्रथा परंपरा असतील त्याचं मूळ मनुस्मृती आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळली होती अशीही आठवण प्रिया दासने करून दिली आहे.