मुंबई – शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर अनेकदा ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थकांमध्ये वाद होताना पाहायला मिळत आहे. काल होळीच्या मुहूर्तावर ठाण्यात शिंदे समर्थक आणि ठाकरे समर्थकांमध्ये शाखेवरून राडा झाल्याचे समोर आले. यावरून दोन गट आमने सामने आल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले होते. ठाण्यात झालेल्या याच राड्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला इशारा दिला आहे. हे फक्त काही दिवसांसाठी आहे पुढे ना सत्ता राहणार आहे ना दादागिरी राहील अशी टीका राऊत यांनी यावेळी शिंदे गटावर केली.
ज्याप्रकारे पोलिसांचा आणि सत्तेचा वापर करून सर्वकाही ओरबाडून नेलं जात आहे ते सगळं आम्ही परत मिळवू असं राऊत यावेळी म्हणालेत. माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी काल ठाण्यात शाखेवरुन झालेल्या राड्याबाबत भाष्य केले. हे फक्त काही दिवसांसाठी आहे. ना ही सत्ता राहील ना ही दादागिरी राहील असा इशारा राऊत यांनी यावेळी शिंदे गटाला दिला.
पोलीस आमच्याविरोधात सत्तेचा वापर करत आहेत याचा अर्थ तुम्ही घाबरत आहात. जर मर्द असाल तर समोर येऊन आमच्याशी लढा बघून घेऊ असं रोखठोक मत राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं. काल ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये शाखेवरून मोठा वाद झाला होता.
काय झालं होत ठाण्यात नेमकं
ठाण्यातील शिवाईनगर येथे शिवसैनिकांमध्ये राडा झाल्याचे समोर आले. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी शिवाईनगर येथील शाखेवर जाऊन शाखेचे कुलूप तोडून शाखा ताब्यात घेतली. हा प्रकार समोर येताच ठाकरे गटाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहचले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पन्नास खोक्यांवरून घोषणाबाजीला सुरुवात केली. यामुळे दोन्हही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि बाचाबाची सुरु झाली.