Bharat Ratna : केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतरत्न पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आल्याचे सांगितले. मात्र भारताचा पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला होता? हा पुरस्कार देण्याची प्रक्रिया काय असते? याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.
‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची प्रथा कोणी सुरू केली?
देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देण्याची प्रथा प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली. हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रातील असाधारण सेवेसाठी दिला जातो. 1954 मध्ये, हा सन्मान केवळ जिवंत व्यक्तीला देण्यात आला होता, नंतर तो मरणोत्तर देण्याची तरतूद जोडली गेली. भारतीय राजपत्रात अधिसूचना जारी करून पुरस्कार प्राप्तकर्त्यांची नावे अधिकृतपणे जाहीर केली जातात. एका वर्षात जास्तीत जास्त तीन लोकांनाच भारतरत्न दिला जाऊ शकतो.
पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला जाहीर झाला?
हा पुरस्कार देण्याची सुरुवात २ जानेवारी १९५४ या दिवसापासून सुरु झाली. पहिला सन्मान स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी, माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमण यांना देण्यात आला होता. सी. राजगोपालाचारी यांनी अण्वस्त्रांच्या वापराला विरोध केल्यामुळे जागतिक शांततेसाठी त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले होते. भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केल्यामुळे आणि डॉ. सी.व्ही. रामन हे प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ होते त्यांच्या उत्तम कार्यासाठी त्यांना भारतरत्न मिळाले होते.
भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलेल्या काय मिळते?
भारतरत्न पुरस्काराने सन्मानित व्यक्तींना सरकारकडून प्रमाणपत्र आणि पदक दिले जाते. सर्वोच्च नागरी पुरस्कार विजेत्यांना देखील विशेष सन्मान प्राप्त होतो. भारतरत्न प्राप्तकर्त्यांना सरकारी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रणे मिळतात. ज्यांना हा सन्मान मिळतो त्यांना सरकारी विभागांकडून रेल्वेकडून मोफत प्रवासाच्या सुविधा दिल्या जातात. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश, लोकसभेचे अध्यक्ष, मुख्यमंत्री आणि संसदेच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते यांच्यानंतर हे स्थान दिले जाते. राज्य सरकारेही त्यांना सुविधा पुरवतात.
भारतरत्न पुरस्कार देण्याची प्रक्रिया काय असते?
भारतरत्न पुरस्कार कोणत्याही व्यक्तीला देण्याची शिफारस भारताचे पंतप्रधान करु शकतात. या व्यतिरिक्त मंत्रिमंडळाचे सदस्य, राज्यपाल आणि मुख्यमंत्री शिफारस करु शकतात. या शिफारशीनंतर पंतप्रधान कार्यालयात चर्चा होते. त्यानंतर राष्ट्रपतींच्या अंतिम मंजुरीची वाट पाहावी लागते. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर भारतरत्न पुरस्कार दिला जातो.
सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार
एखाद्या क्षेत्रात अतुलनीय काम केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारात सुरुवातीला क्रीडा हे क्षेत्र नव्हते. परंतु जनतेकडून सचिन तेंडुलकरला भारतरत्न दिले जावे अशी मागणी करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर तत्कालीन क्रीडा मंत्री अजय माकन यांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र लिहीत क्रीडा विभागाला हा पुरस्कार मिळण्याची तरतूद असावी, अशी विनंती केली. यानंतर सरकारने हा भारतरत्न हा पुरस्कार सगळ्या विभागांसाठी खुला केला जाईल असा निर्णय घेतला. त्यानंतर 2014 मध्ये सचिन तेंडुलकर यांना हा पुरस्कार देण्यात आला.
2019 मध्ये कोणाला मिळाला भारतरत्न पुरस्कार?
2019 मध्ये शेवटच्या वेळी देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना सार्वजनिक कार्यासाठी भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले. त्याच वर्षी सामाजिक क्षेत्रातील नानाजी देशमुख आणि कला क्षेत्रातील डॉ. भूपेन हजारिका यांना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आला.