रामटेक – कॉंग्रेसने एक देश एक कायदा लागू होऊ दिला नाही, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कारापासून अनेकोवर्षे वंचित ठेवले, केवळ जातीभेदाचे राजकारण कॉंग्रेस वाल्यांनी केले, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
भाजप-शिवसेनेच्या रामटेक, नागपूर आणि भंडारा-गोंदिया या तीन लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची रामटेकमध्ये सभा पार पडली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
मोदी पुन्हा सरकारमध्ये आले तर लोकशाही आणि संविधान संकटात येईल, असे इंडिया आघाडीवाले खोटे पसरवत आहेत. मी जेव्हा राजकारणात आलो आहे तेव्हापासून अशी कोणतीही निवडणूक राहिलेली नाही ज्यामध्ये विरोधकांनी अशी भाकडकथा ऐकवलेली नाही.
अटल बिहारी वाजपेयींचे सरकार बनले तेव्हाही ते असेच गीत गात होते. याचा अर्थ यांच्याकडे नवी कल्पनाही नाही. आणीबाणीच्या वेळी लोकशाही धोक्यात आली नव्हती. चारही दिशेला तेच नजर येत होते. तेव्हा लोकशाही धोक्यात नव्हती?, असा सवाल नरेंद्र मोदींनी केला.
पुढे बोलताना मोदी म्हणाले की, 19 एप्रिलला तुम्हाला फक्त एक खासदार निवडायचा नाही तर पुढच्या एक हजार वर्षाचा पाया मजबूत करण्यासाठी मतदान करायचे आहे. आपल्याला विकसित भारताच्या संकल्पासाठी मतदान करायचे आहे. निवडणुकीबाबत मीडियाकडून सर्व्हे दाखवला जातोय. त्यात एनडीएचा बंपर विजय दाखवला जातोय.
या सर्व्हेच्या मागे मीडियावाले इतका खर्च का करता? त्यांना पैसे वाचवण्याचा एक फॉर्म्युला देतो. मोदीला जेव्हा शिव्या वाढायला लागल्या तर समजा पुन्हा मोदी जिंकून येणार. ईव्हीएम प्रश्न उपस्थित झाले तेव्हा समजून जा पुन्हा एकदा मोदी सरकार येणार हे समजून घ्या, असे मोदी म्हणाले.
काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही
एका गरिबाचा मुलगा पंतप्रधान बनताच त्यांना लोकशाही आणि संविधान धोक्यात दिसत आहे. इंडिया आघाडीवाले कधीही गरिबांना पुढे जाताना बघू शकत नाहीत. मराठीत एक म्हण आहे, काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही.
गरिबाच्या मुलावर या लोकांनी कितीही हल्ला केला तरी मोदी देशाच्या संकल्पनांसाठी मागे हटणार नाही. इंडिया आघाडीवाले पूर्ण ताकदीने देशाचे विभाजन करायला लागले आहेत, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.