हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल कराच
ना. अजितदादांना किरीट सोमय्यांचे खुले आव्हान
कोरेगाव – राज्यात 15 वर्षे त्यांचेच सरकार होते. पवार कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री व केंद्रात मंत्री होत्या. त्यावेळी साखर कारखाने पद्धतशीरपणे आजारी पाडण्यात आले. “जाणता राजा’ म्हणवणाऱ्यांनी या कारखान्यांना मदत करायला हवी होती; परंतु त्यांनी व त्यांच्या कंपूने कारखाने बळकावले, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला. जरंडेश्वर कारखान्याचे नेमके मालक कोण? हिंमत असेल तर उपमुख्यमंत्री अजितदादांनी माझ्यावर हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावाच, असे खुले आव्हानदेखील सोमय्यांनी दिले.
सोमय्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, ज्येष्ठ नागरिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबनराव कांबळे, तालुकाध्यक्ष संतोष जाधव यांच्यासमवेत बुधवारी सकाळी चिमणगाव येथील जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली. कार्यकारी संचालक किसनराव घाडगे व जुन्या संचालक मंडळाने जरंडेश्वररूपी मारुतीची मूर्ती देऊन त्यांचे स्वागत केले.
कारखाना उभारणीत आपली हयात घालवलेले व्हाइस चेअरमन शंकरराव भोसले-पाटील, भगवानराव फाळके, श्रीमती जाधव, दत्तूभाऊ धुमाळ, अविनाश फाळके यांच्याशी सोमय्यांनी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पवार कुटुंबीयांवर टीका केली. ते म्हणाले, 80-85 वर्षांचे शेतकरी सभासद मला तीन वेळा मुंबईत आणि साताऱ्यात भेटले. संचालक व संस्थापकांच्या व्यथा ऐकण्याचा आग्रह त्यांनी मला केला.
म्हणून मी येथे आलो आहे. अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर या कारखान्याचा मालक कोण, याचे उत्तर त्यांनी द्यावे. हा कारखाना बेनामी पद्धतीने ताब्यात कसा घेतला, याची कथा त्यांनी सांगितल्यास त्यावर चित्रपट बनवता येईल. आज जो कारखाना चांगल्या पद्धतीने चालतोय, तो शेतकऱ्यांच्या ताब्यात ठेवून चांगला चालवता येत नाही का?
चौकशीत सत्य बाहेर येईल
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या कारखान्याची चौकशी सुरू आहे. डॉ. शालिनीताई पाटील म्हणतात की, दोन्ही पवार “आत’मध्ये जातील, याबाबतच्या पत्रकारांच्या प्रश्नावर सोमय्या म्हणाले, या चौकशीसाठी कायदा आहे, नियम आहेत. न्यायालय त्याबाबत निर्णय घेईल. चौकशीमध्ये सत्य बाहेर येईल.
पवारांचा “किसनवीर’वर डोळा आहे का?
अजित पवार म्हणतात की, सोमय्यांना “किसनवीर’च्या सभासदांचा आक्रोश दिसत नाही का? त्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, सोमय्या म्हणाले, या कारखान्यावरही पवार परिवाराचा डोळा आहे का, याचे उत्तर त्यांनी आधी द्यावे. त्यानंतर मी बोलेन.
“जरंडेश्वर’ शेतकऱ्यांना परत मिळवून देणार
जरंडेश्वर साखर कारखाना बंद होऊ देणार नाही. हा कारखाना शेतकऱ्यांना परत मिळवून देऊ. शेतकरी व कामगारांचे हित पाहिले जाईल. राष्ट्रवादीची नेतेमंडळी गैरसमज पसरवत आहेत, असा आरोप सोमय्यांनी केला.
तुमच्या सत्ताकाळात ताब्यात घेण्यात आलेल्या पाच कारखान्यांचा अभ्यास करत आहे. कारखाना लिलावात विकत घेतल्यावर काही दिवसांत 85 कोटींचे कर्ज कसे मिळते, याचाही अभ्यास करत आहे.
पोलिसांचे प्रसंगावधन
कारखान्याच्या कारभारासंबंधी काही सभासद सोमय्यांना माहिती देत असताना, काही जणांनी विरोध केला. त्यांच्यात हमरीतुमरी सुरू झाली. पोलीस व सोमय्यांनी सर्वांना शांत राहायला सांगितले, तरी हमरीतुमरी सुरू असल्याने पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, सपोनि अर्चना शिंदे व कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने अनुचित प्रकार घडला नाही. सभासदांची निवेदने स्वीकारून सोमय्यांनी बारामतीकडे प्रयाण केले.
अधिकाऱ्यांना न भेटताच सोमय्या निघून गेले
सोमय्यांना भेटायला कारखान्याचे अधिकारी उत्सुक होते. त्यासाठी त्यांनी पोलिसांमार्फत निरोप दिला. सोमय्यांनी कारखान्याची पाहणी करावी, कारखान्यासंदर्भातील न्यायालयीन खटल्यांचे निकाल व कागदपत्रे पहावीत, अशी त्यांची इच्छा होती. काही अधिकारी गर्दीत जाऊन सोमय्यांना विनवणी करत होते; परंतु त्यांना न भेटता सोमय्या निघून गेल्याचे सांगण्यात आले.
==============