नागपूर – कालच हिवाळी अधिवेशन चांगलंच वादळी ठरलं. विरोधकांनी एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, आज अधिवेशनाच्या चौथ्या दिवसाचं कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधक जोरदार आक्रमक झाल्याचं दिसून आलं. विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या पायरीवर येऊन जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारला धारेवर धरलं.
यावेळी खासकरून भूखंड घोटाळ्यावरून विरोधकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच घेरलं. विरोधकांनी हातात श्रीखंडाचे डब्बे घेऊन भूखंडाचे ‘श्रीखंड खाल्ले कुणी? मुख्यमंत्र्यांनी… मुख्यमंत्र्यांनी…’ अशा घोषणाच दिल्या. यावेळी आदित्य ठाकरे आणि रोहित पवार हे दोन्ही नेते घोषणा देण्यात आघाडीवर होते. दोघांनीही हातात बॅनर घेतला होता.
तसेच, अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्यासह छगन भुजबळ, नाना पटोले, भास्कर जाधव, बाळासाहेब थोरात यांच्यासह विरोधी पक्षांचे बहुतांश आमदार या घोषणाबाजीत सहभागी झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काल विरोधकांनी भूखंडावरून आरोप केला होता. आणि याचेच परिणाम आज पाहायला मिळाले.
उद्धव ठाकरे काय? म्हणाले…
उद्धव ठाकरे यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आम्ही त्यांच्यावर आरोप केलेला नाही तर थेट न्यायालयाने सुओ मुटो घेऊन म्हणजे स्वतः पुढाकार घेऊन या प्रकरणाची दखल घेतली आहे. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना मुख्यमंत्र्यांनी पदावर राहणे योग्य नाही.’ असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.