भवानीनगर – श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना उसाचे पेमेंट नाही. कामगारांना पगार व भविष्यनिर्वाह निधी नाही. तोडणी कामगारांचे पेमेंट नाही मग कारखान्याकडे सभासदांच्या कष्टाच्या असलेल्या रुपये तीस कोटी ऐच्छिक ठेवी तरी सुरक्षित आहेत का, याबाबत सभासदांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
कुठे नेऊन ठेवला आहे श्री छत्रपती कारखाना सभासदांचा, असा सवाल साखर संघाचे माजी अध्यक्ष, श्री छत्रपती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केला आहे. जाचक यांनी श्री छत्रपती कारखान्याबाबत निवेदनाद्वारे माहिती दिली आहे.
जाचक म्हणाले की, श्री छत्रपती साखर कारखान्याचा यंदाचा गाळप हंगाम दि. 27 नोव्हेंबर रोजी सुरू झाला. आज दि. 24 डिसेंबरअखेर उसाचे एकूण गाळप 66 हजार 671 टन इतके झाले आहे. त्यापैकी सभासदांचा ऊस 44 हजार 253 टन इतका गाळप झाला आहे. गाळप सुरू होऊन 28 दिवस झाले. त्यामध्ये सभासदांचा ऊस हा प्रतिदिनी सरासरी पंधराशे टन इतकाच गाळप झालेले सिद्ध होत आहे.
गाळपाच्या या गतीने उर्वरित ऊसाचे गाळप कधी पूर्ण होणार, याची सभासदांना चिंता भेडसावत आहे. यावर्षी सर्वच साखर कारखान्यांना ऊसतोड मजूर कमी आले तरी नियोजन शून्य कारभारामुळे सर्वाधिक फटका हा श्री छत्रपतीच्या सभासदांना बसत आहे. सोमेश्वर साखर कारखाना, अजिंक्यतारा कारखाना येथून तोडणी यंत्रणा आणली आहे. मात्र तेवढीच यंत्रणा श्री छत्रपती कारखान्याची दुसरीकडे बिल न मिळाल्यामुळे निघून गेलेली आहे.
कारखान्यास ऊस घातल्यानंतर 14 दिवसात ऊसाची 100 टक्के एफआरपी. देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र 28 दिवस होऊन गेले तरीही अद्याप ऊसाचे पेमेंट बॅंकेत जमा नाही. गतवर्षी ऊसाची एफआरपी उशिरा दिल्यामुळे विलंब व्याज कारखान्याने अद्याप जमा केलेले नाही. कामगारांना दर महिन्याच्या सात तारखेला पगार देण्याची परंपरा आहे.
मात्र अलीकडे सात तारखेला पगार होत नाहीत. हा पगार दि. 25 डिसेंबरपर्यंत झाला नाही. यावेळी बाळासाहेब कोळेकर, शिवाजी निंबाळकर, शिवाजी काटे, विशाल निंबाळकर, बाळासाहेब रायते, उल्हास जाचक, नाना शेंडगे, सतीश काटे, सभासद उपस्थित होते.
खेळत्या भांडवलासाठी कर्ज मागणी
कामगारांचे भविष्य निर्वाह निधीचे पैसे दोन महिन्यांपासून जमा झाले नाहीत. मध्यंतरी जीएसटी थकबाकी असल्यामुळे साखर काही काळ थांबली होती. नुकतीच संचित तोटा वाढत चाललेल्या कारखान्याची यादी प्रसिद्ध झाली आहे. यात श्री छत्रपती कारखान्याचा समावेश आहे. एकेकाळी उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनामध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा साखर कारखाना सध्या खेळत्या भांडवलासाठी कामगार, शिक्षकांच्या पतसंस्थेकडे कर्ज मागणी करतो, हे कशाचे लक्षण आहे. असा सवाल जाचक यांनी केला आहे.