पाथर्डी – पाथर्डी तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागासह शहरातही चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. तालुक्यातील अकोला येथील सुधाकर रामदास शहाणे यांच्या बंद घराचे कुलुप तोडून दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा एकुण 55 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली.
तालुक्यातील अकोला गावातीलच सहा ते सात ठिकाणी चोरी व चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. याबाबत सुधाकर शहाणे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटयांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात मोटारसायकल चोरणाऱ्याची टोळी सक्रिय झाली असून दिवसाढवळ्या मोटरसायकली चोरीला जात आहेत. पोलीस चोरांचा तपास करण्याऐवजी नागरिकांनाच अरेरावीची भाषा वापरतात, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अकोले येथील सुधाकर रामदास शहाणे हे पत्नी चंदा सुधाकर शहाणे यांच्यासह अकोला येथे राहतात. बुधवारी ते दोघे पती- पत्नी नातेवाईकाच्या कार्यक्रमानिमित्त राहुरी येथे मुक्कामी गेले होते, त्यामुळे घर बंद होते. आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पती पत्नी घरी आल्यावर पाहिले असता, चोरटयांनी बंद घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला व घरातील कपाटाचा कोयंडा तोडून कपाटातील 20 हजार रुपये रोख रक्कम, तीस ग्रॅम वजनाचे 30 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व 5 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेल्याचे त्यांना आढळले.
श्वान पथक, ठसेतज्ञ घटनास्थळी भेट दिली. तसेच गावातीलच संगिता संतोष इथापे, रशिद चंदुभाई शेख, रघुनाथ काशिनाथ डुकरे यांच्या घरीही चोरी झाली असुन उस्मान इमाम शेख, रजनीकांत मधुकर नवगिरे, शरद शंकरराव गर्जे यांच्याही घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो फसला. दरम्यान घटनेची माहिती समजताच पोलिस श्वानपथक व ठसे तज्ञासह घटनास्थळी दाखल झाले. गेल्या पंधरा दिवसापुर्वीही अकोला येथे चार ते पाच ठिकाणी चोरी झाली झाली होती.
या घटनेची माहिती समजताच पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण, ग्रा.पं.सदस्य उध्दव माने, संभाजी गर्जे यांनी घटनास्थळी भेट देऊन चोरीचा तातडीने तपास करावा अशी मागणी पोलिसांकडे केली. याबाबत सुधाकर रामदास शहाणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल पी. एन. बांगर करीत आहेत. दरम्यान शहरातील आखर भागातून आण्णासाहेब प्रभाकर नाकडे यांची मोटरसायकल सकाळी चोरीस गेली.
त्याचबरोबर फुंदे टाकळी फाट्यावरून व तहसील कचेरीच्या परिसरातून मोटरसायकल चोरीच्या घटना घडल्या आहेत. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून चोरांचा शोध करण्यापेक्षा पोलिसांकडून नागरिकांनाच अरेरावीची भाषा वापरून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. बुधवारी आठवडे बाजारातून रविंद्र जाधव (रा.शिक्षक कॉलनी) यांचा 15 हजार किंमतीचा मोबाईल चोरी गेला आहे. तक्रार देण्यासाठी गेलेल्या फिर्यादीलाच पोलिसांनी अशा घटना चालू असतात आम्ही तरी कुठे कुठे लक्ष द्यायचे असे सुनावले. पोलिसांच्या भूमिकेविरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.