मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल जळगावमधल्या पाचोऱ्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करत ठाकरे म्हणाले की, तुला आगे ना पिछे, तुला कोणी नाहीये. कधी झोळी लटकवशील आणि निघून जाशील. पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचं काय? असा संतप्त सवाल केला होता. त्यांच्या या भाषेवर आता भाजपकडून आक्षेप घेण्यात येत आहे.
उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर भारतीय जनता पार्टी संतापली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना, कुठे सूर्य आणि कुठे तुम्ही, बोलताना जरा तारतम्य बाळगा. असा सल्ला दिला आहे.
पुढे बोलताना बावनकुळे यांनी, मागेही मी सांगितलं होतं, स्वार्जनिक ठिकाणी बोलताना व्यक्तिगत टीका करू नका. त्यांनी आमच्या नेतृत्वाचा अपमान करू नये. स्फोट होतो एखाद्या दिवशी. तुम्ही आमच्या नेतृत्वाचा एकेरी उल्लेख करताय, याने एक दिवस स्फोट होऊ शकतो. मी मागेही सांगितलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना तारतम्य बाळगा. असंतोष कधी भडकेल हे मला माहिती नाही. यावेळी म्हटले आहे.
बावनकुळे यांनी, “मी आधी सांगूनही काल पुन्हा उद्धव ठाकरे यांनी तीच चूक केली. पुन्हा पुन्हा जाणीवपूर्वक ते तसं करत आहेत, एकेरी बोलत आहेत. त्याचा कधी ना कधी निर्णय होईल. असंतोष भडकेलच. किती दिवस आम्ही संयम बाळगायचा? आमचे कार्यकर्ते किती दिवस हा एकेरी उल्लेख सहन करणार. लोकांना हे (उद्धव ठाकरे) संस्कार शिकवतात पण ते स्वतः कसे वागतात”. असा प्रश्नच त्यांनी यावेळी उपस्थित केला.