मुंबई – किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. नील सोमय्या यांच्या जामीन अर्जावर उद्या, मंगळवारी सुनावणी होणार आहे. आयएनएस विक्रांत बचावसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत घोटाळा केल्याचा पिता-पुत्रांवर आरोप आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. किरीट सोमय्या यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळल्यामुळे अटकेची टांगती तलवार त्यांच्यावर कायम आहे.
यावर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे. त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या,’दर वेळी दुसऱ्यांवर बोटं दाखवून हातोडे घेऊन फिरत होता. आता नॉट रिचेबल का? आम्ही नेहमीच सांगतो की कागद आणि कायद्याची लढाई आहे. आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. त्या संविधानाप्रमाणे आपण लढू. मात्र, महाराष्ट्रात किरीट सोमय्या हे असं कॅरेक्टर तयार झालंय जे फक्त भोंगा घेऊन बोंबलतं असं म्हणत त्यांनी सोमय्यांवर हल्ला बोल केला.
त्या पुढे म्हणाल्या, कमळाचा चिखल गेला कोठे? प्रत्येकवेळी दुसऱ्यांवर बोटं दाखवून दाखवून हातोडे घेऊन फिरत होता. आता का नॉट रिचेबल झाला,असं म्हणत असा सवाल पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांची विक्रांत फाइल्स उघडत अनेक खळबळजनक आरोप केले होते. आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत किरीट सोमय्या यांनी घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती.