बँक फसवणूक प्रकरणी फरार उद्योगपती नीरव मोदीला मोठा धक्का बसला आहे. सीबीआयला मोठे यश मिळाले आहे. नीरव मोदीचा जवळचा सहकारी सुभाष शंकर याला कैरोहून मुंबईत परत आणण्यात सीबीआयला यश आले आहे. शंकर यास देशात परत आणण्यासाठी सीबीआय बरेच दिवसांपासून प्रयत्न करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, 49 वर्षीय सुभाष शंकर 2018 मध्ये नीरव मोदीसोबत भारतातून पळून गेला होता. तो नीरव मोदीचा जवळचा सहकारी मानला जातो. सुभाषला मुंबई न्यायालयात हजर केल्यानंतर सीबीआय आता त्याचा ताबा घेणार आहे.
पीएनबी बँक घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या सीबीआयच्या विनंतीवरून 2018 साली इंटरपोलने नीरव मोदी, त्याचा भाऊ निशाल मोदी आणि त्याचा सहकारी सुभाष शंकर यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. सीबीआयने दाखल केलेले आरोपपत्र आणि विशेष न्यायाधीश जे सी जगदाळे यांनी जारी केलेल्या अटक वॉरंटच्या आधारे इंटरपोलने चार वर्षांपूर्वी मुंबईतील विशेष न्यायालयात रेड कॉर्नर नोटीस (आरसीएन) जारी केली होती.
नीरव मोदीवर 7 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
नीरव मोदीने PNB मधून सुमारे 7000 कोटींचा घोटाळा केला होता. त्यानंतर तो परदेशात पळून गेला. तो सध्या लंडनच्या तुरुंगात आहे. त्याला परत आणण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नीरव मोदीने 2017 मध्ये त्याच्या कंपनी फायरस्टार डायमंड्सद्वारे आयकॉनिक रिदम हाऊस इमारत खरेदी केली होती. त्याची हेरिटेज प्रॉपर्टीमध्ये रूपांतर करण्याची योजना होती. पीएनबी बँकेत केलेल्या घोटाळ्यातून मिळालेल्या पैशांतून त्याने बहुतांश मालमत्ता खरेदी केल्याची माहिती आहे.