केंदूर -पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील भारत गॅस कंपनीकडे जाणारा रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पाठपुरावा करूनही निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. येथील भारत गॅस कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत गेल्या तीन वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. पिंपळे जगताप ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद, स्थानिक आमदार, कंपनीच्या अधिकाऱ्यांकडेदेखील सीएसआर फंडातून रस्ता करण्याची मागणी केली आहे. अद्यापपर्यंत कोणीही दखल घेत नसल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.
गेल्या 15 वर्षांपासून चाकणरस्ता ते भारतगॅस कंपनी पर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. या रस्त्याचा वापर सणसवाडी आणि कोरेगाव भीमा परिसरातील कारखान्यात जाणारे करंदी, जातेगाव, केंदूर येथील कामगार करत आहेत. या रस्त्यावर अनेकवेळा अपघातही घडले आहेत. त्यामुळे या रस्त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी तरी लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.