मुंबई – साल होते 1987 आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा सुरू होता. हैदराबाद येथे झालेल्या रोमहर्षक आणि चुरशीचा एक दिवसाचा सामना भारताने जिंकला. त्यानंतर पाकिस्तानचा खोडसाळ क्रिकेटपटू जावेद मियाँदाद भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये येऊन भारताने हा सामना फसवणूक जिंकल्याचे सांगून वाद घालण्याच्या मूडमध्ये होते. त्यावेळी रवी शास्त्री बूट घेऊन त्याच्या अंगावर धावला आणि मग मियाँदादने पळ काढला. शास्त्रीने पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुमपर्यंत त्याचा पाठलाग केला आणि शेवटी कर्णधार इम्रान खानने हे भांडण मिटवले.
रवी शास्त्री यांचे स्टारगेझिंग – द प्लेअर्स इन माय लाईफ हे पुस्तक लवकरच येत असून त्यात त्यांनी मियाँदादचा हा किस्सा लिहिला आहे. लहानपणी रवी शास्त्रीला रेडिओवर क्रिकेटचे समालोचन ऐकायला फार आवडायचे. अगदी रेडिओला कान चिटकवून तो बसलेला असायचा आणि त्याचा आदर्श फलंदाज गुंडाप्पा विश्वनाथच्या खेळाचे वर्णन तो एकाग्रतेने ऐकायचा. अगदी दशकभरातच हाच रवी क्रिकेटच्या मैदानात उतरला आणि आणि एकाच षटकांत एकामागून एक असे सहा षटकार लगावत जगभर स्वतःचे चाहते निर्माण केले.
चाम्पियन ऑफ चाम्पियन्स ते जगातील एक सर्वोत्तम समालोचक आणि सध्या भारतीय पुरूष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक असा प्रवास करणाऱ्या शास्त्रीने त्याला भेटलेल्या खेळाडूंचे किस्से, गंमती लिहून काढल्या आहेत. मियाँदादचा किस्सा सांगताना तो लिहितो, 1987 च्या हैदराबाद येथे झालेल्या चुरशीच्या एक दिवसाच्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर अब्दुल कादिरने एकच धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा त्याने प्रयत्न केला नाही आणि सामन्यात दोन्ही संघाची धावसंख्या बरोबरीत सुटली.
त्यावेळी पाकिस्तानने सात गडी गमावले होते आणि आधी फलंदाजी करताना भारताने फक्त सहा गडी गमावले होते. त्यामुळे सामन्याच्या परिस्थितीनुसार भारतीय संघाला विजयी घोषित करण्यात आले आणि हे मियाँदादच्या पचनी पडले नाही. सामना संपल्यानंतर तो आमच्या ड्रेसिंग रुममध्ये आला आणि मोठमोठ्या वाद घालू लागला. आम्ही फसवून सामना जिंकल्याचे त्याचे म्हणणे होते. सामना संपला तरी माझे रक्त उसळत होते आणि मियाँदादचे बोलणे सहन न झाल्याने मी तिथल बूट उचलला आणि त्याच्या दिशेने धावलो. तो पळाला. मी थेट पाकिस्तानच्या ड्रेसिंगरूमपर्यंत त्याचा पाठलाग केला. तिथे इम्रान खानने मध्यस्थी केली आणि वाद मिटवला.
सुनील गावस्कर यांच्याविषयी लिहिताना तो म्हणतो, मी त्यांच्याबरोबर सलामीच्या फलंदाज म्हणून 1980 मध्ये काही कसोटी सामन्यात खेळलो आहे. 22 यार्डावरून त्यांची फलंदाजी पाहणे म्हणजे कसे खेळावे याची एक शिकवणीच असायची. त्यांची उभी राहण्याची पद्धत, बॅटवरील पकड, चेंडू खेळतानाचे पदलालित्य, संतुलन, एक-दोन धावांसाठी रनिंग बिट्वीन विकेटस् आणि फटक्यांची निवड हे सगळे लाजवाब होते.
अगदी परिपूर्ण. या पुस्तकात सर गॅरी सोबर्स, टायगर पतौडी, गुंडाप्पा विश्वनाथ, इम्रान खान, विवियन रिचर्डस्, कपिलदेव, अॅलन बॉर्डर, स्टीव वॉ, माल्कम मार्शल, अर्जुन रणतुंगा, सचिन तेंडुलकर, शेन वॉर्न, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी, राहुल द्रविड, रोहित शर्मा, आर. अश्विन, विराट कोहली, बेन स्टोक्स, रवींद्र जाडेजा आदी क्रिकेटपटूंचा खेळ आणि किस्से रवी शास्त्रीने लिहिल आहेत.