कणकवलीः मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वभिमानी पक्षाचे अखेर आज भाजप मध्ये विलीनीकरण झाले आहे. यावेळी खासदार निलेश राणेंसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यानंतर नारायण राणेंनी माध्यमांशी संवाद साधत असताना शिवसेनेवर प्रहार केला आहे.
राणे म्हणले की, शिवसेनेशी माझा काहीही संबंध नाही, मी भाजपात आहे. भाजपात प्रवेश घेऊन ताससुद्धा झाला नाही. मी शिवसेनेला विचारात घेत नाही. मी त्यांची दखलही घेत नाही. सेना कुठेही असली तरी आम्हाला फरक पडत नाही. शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद द्या किंवा इतर कोणतंही पद द्या, त्याच्याशी काही कर्तव्य नाही, असं म्हणत नारायण राणेंनी शिवसेनेवर जोरदार प्रहार केला आहे.
माझा पक्ष माझ्या पाठीमागे खंबीर आहे. नितेशच्या पाठीमागे खंबीर आहे. तर मला चिंता करायचा प्रश्नच येत नाही. मालवण आणि सावंतवाडी मतदारसंघात भाजपा पुरस्कृत उमेदवार आहेत, दोन्ही निवडून येतील, अशी परिस्थिती आहे, असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
तसेच प्रत्येकाच्या मनाचा प्रश्न आहे, आपण काय आश्वासनं दिली होती. युतीचा बेस काय आहे, युती कशासाठी आहे. त्याची नीतिमत्ता प्रत्येकाननंच सांभाळली पाहिजे. मी महाराष्ट्रात काम करेन की दिल्लीत हे पक्षप्रमुख निर्णय घेतील. माझ्या पक्ष प्रमुखांचा प्रश्न आहे, हा भाजपाचा प्रश्न आहे, त्यांना माझा कुठे वापर करावा, त्याचा निर्णय तेच घेतील, असही राणे म्हणाले आहेत.