नवी दिल्ली – कोविड -19 मुळे जागतिक साथ पसरलेली असताना देखील गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी गव्हाच्या खरेदीत 15 टक्क्याची वाढ झाली अशी माहिती केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी दिली. देशभरातून 390 लाख टन गव्हाची खरेदी झाली आणि टाळेबंदीचे सर्व नियम पाळून, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जाऊन खरेदी प्रक्रिया पूर्ण केली असे त्यांनी सांगितले.
करोनाच्या साथीच्या काळात कृषी क्षेत्रासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती देत, केंद्र सरकारने या काळात धान्य खरेदी आणि इतर कल्याणकारी योजनांसाठी 75 हजार कोटी रुपये वितरीत केले. करोना साथीच्या काळात सरकारने गहू खरेदी केंद्रांच्या संख्येत तिपटीने वाढ केली तर डाळी आणि तेलबिया यांच्या खरेदी केंद्रांची संख्या देखील जवळजवळ तिप्पट केली अशी माहितीही त्यांनी दिली.
गेल्या सहा वर्षांच्या काळात, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, मृदा आरोग्य पत्रिका,पीएम किसान सन्मान निधी योजना, किसान कार्ड, सूक्ष्म सिंचन,ई मंडीची निर्मिती यासारखे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. या काळात सरकारने पिकांचे किमान आधारभूत मूल्य देखील टप्प्याटप्प्याने वाढविले आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की कृषी क्षेत्राच्या कल्याणासाठी सुरु केलेले नवीन उपक्रम आणि नवे कृषी कायदे यामुळे शेतकऱ्यांना विशिष्ट संरक्षण आणि सुरक्षाविषयक तरतुदी करण्यात आल्या आहेत, या नव्या घडामोडीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि कृषी क्षेत्राची भरभराट होईल, असे त्यांनी सांगितले.