वालचंदनगर परिसरात शेतकरी चिंताग्रस्त : गव्हाच्या उत्पादनात घट येणार
वालचंदनगर- दुष्काळामुळे चांगली मशागत झालेल्या जमिनी तयार झालेल्या होत्या. त्यात यावर्षी परतीच्या पावसाने दिलासा दिला होता. त्यामुळे विहिरी, तलावामधील पाण्याची पातळी वाढली आहे. पावसानंतर वापसा येताच गहू, मका, हरभरा आदी पिकांची लागवड होईल. चांगले उत्पन्न हाती येईल, अशी आशा होती. मात्र, उघडीपीनंतर पेरणी सुरू झाली होती. ढगाळ वातावरण व थंडीची तीव्रता कमी-अधिक असल्यामुळे पेरलेल्या गव्हावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे यंदा गव्हाची आरोग्य पत्रिकाच बिघडली आहे.
इंदापूर तालुक्यात सर्व भागांमध्ये गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. गहू काढणीसाठी मशीनचा वापर केला जात आहे. यावेळी पावसाने उघडीप दिली नाही. त्यामुळे गव्हाच्या पेरण्या उशिरा सुरु झाल्या. पेरण्या होताच वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा ढगाळ हवामानाची धास्ती घेतली. त्यामुळे पेरणी लांबणीवर टाकली.मात्र, दिवसेंदिवस ढगाळ वातावरण व अचानक बदल सुरू असल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.
सध्या ढगाळ हवामानामुळे मावा किडीच्या विष्ठेद्वारे पानांवर, खोडावर व गव्हाच्या कोवळ्या शेंड्यांवर टाकल्या जाणाऱ्या चिकट द्रवाच्या स्वरूपातील काळ्या बुरशी तयार होणे, माव्याचा व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.