ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या भावना
पुणे : “डॉ. श्रीराम लागू हे अत्यंत उत्तम अभिनेते होते. मी त्यांच्याकडून खूप शिकलो आहे. भारतातील उत्तम कलाकारांची यादी बनविली किंवा नाटकाचा इतिहास लिहायला घेतला तर तो डॉ. लागूंच्या नावाशिवाय पूर्ण होणे अशक्यच आहे,” अशा भावना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केल्या.
‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘१८ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात ‘पिफ’मधील ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड’ने विक्रम गोखले यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यानिमित्त आज त्यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी ‘पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व ‘पिफ’चे संचालक जब्बार पटेल उपस्थित होते.
“जब्बार मला सिनिअर असून माझे सहेतु टीकाकार होते. ज्यामुळे माझ्यात अनेक चांगले बदल घडले व नंतर त्याचे त्यांनी कौतुकही केले,” अशा भावना गोखले यांनी व्यक्त केल्या.
गोखले म्हणाले, “मला आजवर अनेक मोठे पुरस्कार मिळाले आहेत. पण हा पुरस्कार माझ्या भावनांच्या जवळचा आहे कारण माझे लाडके कलाकार डॉ. लागू यांना समर्पित महोत्सवात मला हा पुरस्कार देण्यात आला आहे. डॉ. लागू यांच्या तोडीचा नट सापडणे फारच कठीण आहे. त्यांनी थेट माझ्या जवळ माझे कौतुक केले नाही. मात्र माझा अभिनय नाटकी नसून सहज आहे याचा उल्लेख त्यांनी डॉ. शांताबाई जोग यांच्याकडे केला होता. ते मला भावले आणि मी त्यांच्या अधिकच प्रेमात पडलो. मी त्यांचा फार मोठा चाहता असलो तरी मला तुमचे हे काम आवडले नाही, असेदेखील मी त्यांना विश्लेषण करून सांगत असे व आमच्या चर्चा रंगत असत.” अशा अनेक उदाहरणांसह त्यांनी लागूंच्या आठवणींना उजाळा दिला.
अभिनेता, लेखक, दिग्दर्शकाने नेहमी शिकत राहत विकास करावा असे सांगताना ते म्हणाले, “रंगभूमी ही अशी एकमेव जागा आहे जेथे तुमच्यातील विद्यार्थी जागता ठेवत तुम्हाला खूप काही शिकवतो व तुमचा आत्मविश्वास वाढतो. लेखन, दिग्दर्शन, अभिनयाच्या व्याख्या दर ५-७ वर्षांनी बदलतात व त्या बदलत रहाव्या म्हणजे कलाकाराचा विकास होतो व प्रेक्षकही शिकत शहाणा होतो.”
“वेबच्या व्यासपीठावर सेन्सोरशीप नसल्याने त्याचा गैरफायदा घेतला जात आहे. तो रोखण्यासाठी काय करता येईल याचा विचार करण्याची वेळ आली आहे. परंतु सेन्सोरशीप ही सरकारचीच असावी, कोणाचीही खासगी सेन्सोरशीप अयोग्यच आहे.” असे स्पष्ट मतही त्यांनी मांडले.