पुणे : संगीत हे चित्रपटातील कथा व प्रेक्षक यांना भावनिकरीत्या जोडण्याचा काम करते, त्यामुळे चित्रपटात साऊंड ट्रॅक महत्त्वाचे असतात, असे मत प्रसिद्ध ध्वनी दिग्दर्शक व ध्वनी डिझायनर बिश्वदीप चॅटर्जी यांनी व्यक्त केले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा अंतर्गत ‘ध्वनी’ या विषयावर चॅटर्जी यांचे आज सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉल मधील पीव्हीआर येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल हे देखील या वेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बिश्वदीप चॅटर्जी म्हणाले, आपण आमची पिढी ही खरेतर नशीबवान आहे. आमच्या पिढीने चित्रपट क्षेत्रातील अॅनालॉग, मॅग्नेटिक प्लॅटफॉर्म आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांसारख्या अनेक गोष्टी जवळून बघितल्या. या बदलाचे आम्ही साक्षीदार आहोत. जेव्हा आपण चित्रपटामधील ध्वनीचा विचार करतो तेव्हा आपल्याला प्राथमिकपणे कथा समजून घेऊन ध्वनीचा वापरा कसा प्रभावीपणा करता येईल हे समजून घेतले पाहिजे. चित्रपटात आपण आपल्याला हवा तो ध्वनी पुन्हा निर्माण करीत असल्याने त्यामधील तारतम्य लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.”
मी ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटासाठी काम करीत असताना चित्रपटाची कथा समजून घेतली, त्यासाठी त्या संबंधीची पुस्तके वाचली, चित्रपटाकडे पाहण्याचा दिग्दर्शकाचा दृष्टीकोन समजून घेतला आणि साउंड ट्रॅक डिझाईन केले. हे करीत असताना महाराष्ट्राची संस्कृती, पेशव्यांची पार्श्वभूमी, त्यांच्या घरातील वातावरण, त्या काळातील परिस्थिती या सर्व बाबींचा स्वत: अभ्यास केला, असेही चॅटर्जी यांनी नमूद केले.
कोणताही चित्रपट लिहिताना तो लिहिण्याच्या वेळेपासूनच त्यामध्ये साउंड डिझायनरचे काम सुरु व्हायला हवे. कथेला आणखी प्रभावीपणे दाखविण्यासाठी साउंडचा वापर महत्त्वाचा ठरतो. मात्र तो कथेवर वरचढ होता कामा नये याचीही काळजी घेतली गेली पाहिजे. आजच्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा विचार करून साउंड डिझाईन केल्यास त्याचा फायदा चित्रपटाला नक्की होतो. ‘बाजीराव मस्तानी’, ‘उरी’ या चित्रपटांच्या उदाहरणामधून हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे असेही बिश्वदीप चॅटर्जी यांनी सांगितले.