सोरतापवाडी, (वार्ताहर) – पुणे शहरात व जिल्ह्यात झपाट्याने नागरिकीकरण वाढत असून शहराच्या पाचही महामार्गालगत मोठमोठ्या कंपन्या, आयटी पार्क, शाळा, कॉलेजेस, मोठमोठ्या बांधकाम व्यावसायिकांनी उभारलेले प्रकल्प. या सगळ्यांचा ताण वाहतुकीवर पडत आहे. पुणे तेथे काय उणे वाहतुकीचे वाजले तुणतुणे अशी म्हणण्याची नागरिकांना वेळ आली आहे.
पुणे सोलापूर -महामार्गावर हडपसरपासून वाहतूक कोंडीला सुरुवात होऊन ती दौंड तालुक्याच्या हद्दीपर्यंत चालू असते. हडपसर येथे संध्याकाळच्या वेळेस लावलेल्या बसेसमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. तसेच 15 नंबर चौकात वळताना आडवी तिडवी वाहने शिरूर वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडत आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा कै. आण्णासाहेब मगर उपबाजार मांजरी येथे असून हवेली, पुरंदर, दौंड, इंदापूर या तालुक्यांसह सोलापूर जिल्ह्यातून शेतकरी माल घेऊन येतात. येथे दुपारच्या वेळी महामार्ग सतत वाहतूक कोंडीने ग्रासलेला असतो.
पुढे शेवाळेवाडी येथे बेशिस्त वाहनचालकांमुळे सतत वाहतूक कोंडी होत आहे. कदमवाकवस्ती हद्दीत हिंदुस्तान पेट्रोलियमचा डेपो असून टँकरचालक सकाळी महामार्गावरच टँकर रांगेत उभे असतात. लोणी स्टेशन येथील चौकात महामार्गाच्या कडेने लावलेल्या गाड्यांमुळे नागरिकांना दररोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
या परिसरात रेल्वे स्टेशन, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, हॉटेल, एक मोठे हॉस्पिटल तसेच अनेक मोठमोठ्या गृह निर्माण सोसायट्या, एक मोठे कॉलेज कॅम्पस असल्यामुळे या चौकात नेहमी गर्दी असते. थेऊर फाटा येथे थेऊरला जाणार्या वाहनामुळे वाहतूक कोंडी होत आहे. नायगाव चौकात म्हातोबाची आळंदी व नायगावला जाणार्या वाहनामुळे वाहतूक कोंडीत आणखीच भर पडते.
हवेली तालुक्यातील सर्वात मोठी असणारी उरुळी कांचन येथील बाजार पेठेत बेशिस्त पार्किंगमुळे महामार्गालगत एलाईट चौक ते महात्मा गांधी रस्त्यापर्यंत अनेक बँका व विविध प्रकारची दुकाने असून स्थानिक नागरिक बिनधास्त महामार्गावर आपली चारचाकी गाडी लावून जातात.
आश्रम रोड वर सुद्धा बिनधास्त पार्किंग होत असून वाहतूक पोलीस व ग्रामपंचायत त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. महात्मा गांधी रस्ता तर हा आपली घरची मालमत्ता असल्याच्या अविर्भावात येथे पार्किंग होत आहे. अनेक ठिकाणी सिग्नल बसविले असून येथे मोठ्या प्रमाणावर सिग्नल तोडून वाहन चालक प्रवास करताना दिसत आहेत.
पुलाचे नियोजन बारगळले
पुणे सोलापूर महामार्गावर कवडीपाट ते कासुर्डी पर्यंत 27 किलोमीटरचा चार पदरी रस्ता बांधताना भविष्यातील वाहतुकीचा प्रश्न विचारात घेऊन या ठिकाणी उड्डाणपुलाचे नियोजन केले होते. पण स्थानिक गावपातळीवर त्या पुलाचे नियोजन बारगळले. आता त्याचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. उरुळीकांचन येथे वाहतुकीचा बोजवारा उडालेला दिसतो.
महामार्गावरील वाहतुकीची या चौकात सतत प्रचंड कोंडी होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गावागावातून पर्यायी रस्त्याचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे अनेक ग्रामस्थांनी सांगितले.
वाहतूक पोलीस असावेत
पुणे सोलापूर महामार्ग हडपसरपासून उरुळी कांचनपर्यंत वाहतूक कोंडीने ग्रासला असून शेतकरी कामगार विद्यार्थी व या महामार्गावर प्रवास करणार्यांना रोजच या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे; परंतु कुणीही पुढारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र घेऊन काम करत नसल्याचे दिसून येते.
पूर्व हवेलीच्या प्रश्नाबाबत शिवसेना शिरूर हवेली संघटक (ठाकरे गट) स्वप्निल कुंजीर यांनी सांगितले की, वाहतूक कोंडीसाठी महामार्गावर येणार्या प्रत्येक गावांच्या मुख्य चौकात सिग्नल बसवणे गरजेचे असून वाहतूक पोलीस नेमावेत.