पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – नीलायम चित्रपटगृहाच्या मागील बाजूने स. नं. १३३ इंदिरा गांधी वसाहत येथून जाणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली होती. ती अखेर पालिकेने रोखली आहे. पाणी वाहून जाणाऱ्या या भागास वेल्डिंग करून गळती थांबवण्यात आली आहे. त्यामुळे हजारो लिटर पाण्यची बचत होणार आहे.
पर्वती जलकेंद्रातून शहराच्या मध्यवर्ती भागासह लष्कर जलकेंद्राकडे जाणारी १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीच्या जोडणीला भेग़ा पडल्या होत्या. याबाबत स्थानिक नागरिकांनीही महापालिकेस वारंवार कळवले होते. त्यानंतरही पाणीपुरवठा विभागाकडून काहीच केले जात नसल्याचा आरोप नागरितांनी केला. ही गळती दिवसेंदिवस वाढतच होती.
तर, या पाण्याला प्रेशर अधिक असल्याने असल्याने नागरिकांनीच त्यावर बॅनर झाकून गळती रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, गळती वेळीच रोखली न गेल्यास जलवाहिनीला धोका असून, ती फुटल्यास मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाण्याची भीती होती.
यंदा खडकवासला धरणसाखळीत जलसाठा कमी असल्याने पाण्याची बचत करणे गरजेचे आहे. त्यामुळे ही पाणीगळती थांबविण्याची मागणी स्थानिकांनी केली होती. याबाबत दैनिक “प्रभात’ने दिलेल्या वृत्ताची दखल घेत महापालिकेने ही जलवाहिनी अखेर दुरूस्त केली आहे.