प्रियंका गांधी यांचे प्रतिपादन
गाझीपूर, (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल काहीही लागला तरी आपण उत्तर प्रदेश सोडून जाणार नाही, असे प्रतिपादन कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केले आहे.
उत्तर प्रदेश ही आपल्या पूर्वजांची भूमी आहे. त्यामुळे निवडणूकांचा निकाल काहीही लागला तरी आपण येथून जाणार नाही, आणि राजकारणात खरा आणि योग्य बदल घडवून आणण्यासाठी लोकांबरोबर संघर्ष करतच राहणार असल्याचे प्रियंका गांधींनी म्हटले आहे. निवडणूकीच्या अखेरच्या टप्प्यात मतदान होत असलेल्या गाझीपूरमधील अखेरच्या प्रचार सभेमध्ये त्या बोलत होत्या.
उत्तर प्रदेशातील जनतेची जात आणि धर्माच्या नावावर दिशाभूल केली जात आहे. इथल्या राजकीय नेत्यांमुळे जनतेचे सर्वाधिक नुकसान होत आहे. पण नेत्यांचे काहीही मुकसान होत नाही. लोकांना गरीब ठेवून त्यांना पुन्हा सत्तेत यायचे आहे, असेही प्रियंका गांधी म्हणाल्या. ही भूमी आपल्या पूर्वजांची आहे. त्यांच्या रक्ताने या भूमीचे सिंचन झाले आहे. त्यामुळे जोपर्यंत योग्य आणि खरा राजकीय बदल घडवून आणला जात नाही, तोपर्यंत येथेच थांबण्याचा निर्णय आपण घेतला असल्याचे प्रियंका गांधींनी सांगितले.
भाजपवर जोरदार टीकास्त्र
भाजपने राष्ट्रवादाच्या नावाखाली नोटबंदी आणि जीएसटी आणला. देशप्रेमाच्या नावाखाली जनतेला रांगेत उभे रहायला लावले. जनतेचे उद्योग बंद पडले मात्र काळा पैसा काही आला नाही. अचानक लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या उद्योगांचे काही नुकसान झाले नाही. मात्र लहान उद्योग मात्र पूर्ण बंद पडले. शेतकऱ्यांच्या हिताच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या अनेक योजनांना केवळ शेतकऱ्यांसाठीची नावे देण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त शेतकऱ्यांना या योजनांचा काहीही लाभ झाला नाही, अशी टीकाही प्रियंका गांधी यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभर हिंडतात मात्र ते शेतकऱ्यांशी चर्चा करत नाहीत. हा कुठला राष्ट्रवाद असा सवालही त्यांनी उपस्थित केला?