पुणे -आई आजारी असल्याने आजीकडे गेलेला मुलगा पुन्हा आई-वडिलांकडे जाण्यास तयारच नाही. लॉकडाऊनच्या काळापासून त्याला आजीकडेच रहावेसे वाटणे सुरू झाले आहे. त्यामुळे बारा वर्षांच्या मुलगा आजीकडे राहणार, की आई-वडिलांकडे याचा वाद उच्च न्यायालयात गेला. उच्च न्यायालयाने मुलाचा ताबा आई-वडिलांकडे देण्याचा आदेश दिला आहे. मात्र, तो मुलगा न्यायालयाचा निकाल काही का असेना, मी आजीकडेच राहणार असल्याचे सांगत आहे.
चिंटू हा त्याच्या आईच्या आईकडे नाशिकला राहायला गेला. तो तेथेच रमला आहे. तर त्याची आई माधवी आणि वडील माधव (सर्व नावे बदललेली) हे पुण्यातच असतात. आई गृहिणी आहे. तर, वडील आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. वडील त्याला घेऊन येण्यासाठी नाशिकला गेले. मात्र, त्याने पुन्हा पुण्यात येण्यास नकार दिला. आजीनेही मुलाच ताबा देण्यास विरोध दर्शवला. त्यामुळे वाद झाल्यानतर हे प्रकरण न्यायालयात गेले.
माधव यांनी मुलाचा ताबा मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज केला. मात्र, आई-वडील मुलाला त्रास देतात. त्याचा व्यवस्थित सांभाळ करत नाहीत, असे आजीने तेथे न्यायालयात सिद्ध केले. त्यामुळे चिंटूचा ताबा त्याच्या आजीकडेच राहू द्यावा, असा आदेश न्यायालयाने दिला. या आदेशाविरोधात मुलाचे आई-वडील जिल्हा बाल न्यायालयात गेले. त्या न्यायालयात असे दावे चालवण्याचा अधिकार नसल्याने आई-वडिलांनी ऍड. सूचित मुंदडा आणि ऍड. राजेश मोरे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अपील केले. तेथे न्यायालयाने आई-वडिलांच्या बाजूने निकाल दिला.
“मुलाला ताबडतोब आई-वडिलांच्या ताब्यात द्या,’ असा आदेश देण्यात आला आहे. त्याबरोबरच आजीलाही मुलाला भेटण्यास परवानगी दिली आहे. आजीने प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी 2 ते 5 यावेळेत मुलाला भेटावे, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना बोलावण्यात आले. मुलाचा हट्ट पाहून निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची, हा प्रश्न पोलिसांना पडला आहे.