उद्यान विभागासह घंटागाडीतील कचऱ्याचा समावेश
पुणे – शहरात कचरा जाळण्यास मनाई असताना, विठ्ठलवाडी परिसरातील मुठा नदीपात्रात उद्यान विभागाने सिंहगड रस्ता परिसरात संकलित केलेला आणि घंटगाड्यांद्वारे जमा केलेला कचरा रातोरात जाळण्यात येत आहे. मंगळवारी सायंकाळी आठच्या सुमारास या भागात 100 मीटर अंतरात तीन ठिकाणी अशा प्रकारे कचरा जाळण्यात आला. त्यामुळे परिसरात धुराचे लोट उठले होते.
उद्यान विभागाची कचरा संकलन वाहने या परिसरातील झाडांचा कचरा नदीपात्रालगत टाकत आहेत. शिवाय काही छोट्या गाड्याही रात्रीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात कचरा टाकत आहेत. त्यानंतर आठवडाभर हा कचरा साठवून रात्रीच्या वेळी पेटवून दिला जात आहे.
त्यामुळे या भागातील नदीकाठावरील झाडे, वनस्पती जळत असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार वारंवार होत असतानाही घनकचरा व्यवस्थापन विभाग याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. तर, महापालिकेचेच कर्मचारी हा प्रकार करत असल्याने नागरिकही नाराजी व्यक्त करत आहेत.
कारवाई करायची तरी कोणावर?
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार कचरा जाळण्यास मनाई आहे. असे प्रकार आढळल्यास संबंधितांकडून दंड आकारण्यात येतो. मात्र, ज्यांच्यावर या कारवाईची जबाबदारी आहे, त्यांच्याच सहकाऱ्यांकडून हे प्रकार केले जात आहेत. त्यामुळे कचरा जाळण्यासारखा गंभीर प्रकार समोर घडत असूनही कोणावर कारवाई करायची? असा प्रश्न उपस्थित करत हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे.