मुंबई : छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पार पडली. राज्यातील सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडीची ही पहिली संयुक्त सभा होती. या सभेला उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मोठ्या नेतेमंडळीची उपस्थिती होती. या सभेतून उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर टीकास्र सोडल्यानंतर त्यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया सामोरे आल्या आहेत. यासंदर्भात बोलतान शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत’ सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत शिव्या देण्याचं काम होत असल्याचे म्हटले. हे करत असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.
“महाराष्ट्राची राजकीय संस्कृती, राजकीय स्तर घसरल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंच फक्त शिव्याशाप देण्याचं काम केलं जात आहे. अशी परिस्थिती महाराष्ट्रानं कधी पाहिली नव्हती”, असेही श्रीकांत शिंदे याची म्हटले.
पुढे बोलताना, “९ महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात ज्या काही गोष्टी घडल्या, त्यामुळे सत्ताबदल झाला. कधी विचारही केला नव्हता की अशा काही गोष्टी होतील. पण त्यामुळेच आज हा सगळा थयथयाट पाहायला मिळत आहे. रोज कुणाला ना कुणालातरी शिव्या दिल्या जात आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीत विकासाचा शब्दही काढला जात नाहीये. पण जे आज मोठमोठ्या सभा करत आहेत त्यांनी गेल्या अडीच वर्षांत नेमकं काय केलं? हे त्या सभेतून आधी सांगायला पाहिजे”, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.