नगर – ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे एका शेतकऱ्याच्या घरात पाणी शिरले. त्याची तक्रार प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर त्यांनी संबंधित ठिकाणी भेट दिली. व सर्व काम बरोबर आहे. असे सांगून ते निघून गेले. त्यानंतर एका शेतकऱ्याने पाण्याचा प्रवाह पाहता ह्या टाकलेल्या नळ्या उलट्या असल्याचा दावा केला असून, कार्यकारी अभियंता अभय पेशवे काय पाहून गेले असा सवाल उपस्थित केला आहे.
नगर तालुक्यातील मांजरसुंबा-डोंगरगण शिवरस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरु आहे. काळा-मळा वस्ती येथील पांद रस्त्यावरील (सीडीवर्क) पूर्वी असलेल्या नळ्या या ठेकेदाराने बुजविल्या. पावसाळ्याचे दिवस असल्याने, या पांद रस्त्याला मोठ्या प्रमाणात पाणी येते. हे त्या शेतकऱ्याने ठेकेदाराला वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केले. अन त्याच दिवशी मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने, त्या शेतकऱ्याचे घरात रात्रीच अचानक पाणी शिरले. त्यात त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याबाबत शेतकऱ्यांने संबंधित ठेकेदाराला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. मात्र, ठेकेदाराने त्याकडे दुर्लक्ष केले. याबाबत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांच्याकडेही तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर ठेकेदाराने (सीडीवर्क) नळ्या टाकल्या आहेत.
त्यावेळी कार्यकारी अभियंता यांनी संबंधित कामाची पाहणी केली. सर्व काम व्यवस्थित असून बरोबर आहे. असे त्यांनी सांगितले. ते गेल्यानंतर एका जाणकार शेतकऱ्याने पाण्याचा प्रवाहाची दिशा पाहाता ठेकेदाराने टाकलेल्या नळ्या ह्या उलट्या असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे चक्क कार्यकारी अभियंता यांनी काय पाहणी केली? अशी उलट सुलट चर्चा गावात सुरु आहे.