पारगाव शिंगवे (वार्ताहर) – महावितरण कंपनीच्या विजेच्या खांबामधील विद्युत वाहक तारांमध्ये घर्षण होऊन विद्युत ठिणगी उसाच्या शेतात पडून शेतातील तीन एकर ऊस जळून गेल्याची घटना मंगळवार (दि.७) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जवळे (ता.आंबेगाव) येथे घडली.
जवळे गावच्या लायगुडेमळा येथे कैलास बबन लायगुडे यांच्या शेतजमिनीत पाऊने तीन ऐकर ऊस व शेजारील शेतकरी लहू एकनाथ बोराटे यांचा अर्धा ऐकर ऊस होता. दुपारी २ वाजेच्या सुमारास शेतातून जात असलेल्या विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन विद्युत ठिणगी उसाच्या शेतात पडली. शेतातील ऊसाने पेट घेतला.
दुपारची वेळ असल्याने व तिव्र उष्णतेमुळे आगीने उग्र रूप धारण केले होते. ग्रामस्थ गोळा होवून उसाच्या शेताजवळ आले परंतु मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीमुळे ऊसाला लागलेली आग विझवता आली नाही. कैलास लायगुडे यांचा अडीच एकर ऊस जळून गेला. या शेतकऱ्याचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. तर शेजाराचे शेतकरी लहू बोराटे यांचा अर्धा एकर ऊस जळून गेला व त्यांचे एक लाख रुपयांचे नुकसान या आगीमुळे झाले.
लायगुडेमळा येथील महावितरण कंपनीची विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा जुन्या झालेल्या आहेत. तसेच या विद्युत तारा शेतात लोंबकळल्या अवस्थेत असून यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते. या महावितरण कंपनीने दुरुस्ती करून नवीन तारा तातडीने बसवाव्यात, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी दिलीप लायगुडे यांनी महावितरण कंपनीकडे केली आहे.विद्युत वितरण कंपनीचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.