नगर -अधिकारी, पदाधिकारी यांच्यात कुठल्याही प्रकारचा समन्वय नसलेले हे सरकार आहे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत आहे. त्यात अनेक नागरिकांची करोनाची तपासणी होत नसून, त्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. त्यावर आपण काही बोललो की त्याचे राजकारण करता, असा आरोप सत्ताधारी करत आहेत. त्यामुळे गोंधळलेल्या अन् संभ्रमामध्ये हे सरकार असल्याची टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
नगर जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा दरेकर यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष मुंडे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
दरेकर म्हणाले, मुंबईच्या तुलनेत नगरला करोनाचा प्रादुर्भाव फार कमी आहे. तो वाढू नये, यासाठी प्रशासनास सूचना केल्या आहेत. तसेच मुंबई, पुण्याहून आलेल्या आगंतुकांना सोयीसुविधा मिळत आहेत की नाही, याचाही आढावा घेतला आहे. या सुविधा पुरविण्यासाठी सरकारने प्रत्येक गावास दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे. केरळसारख्या राज्याने 20 हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. तशीच मदत राज्य सरकारने करावी. निसर्ग चक्रीवादळात ज्या जिल्ह्यांचे नुकसान झाले आहे, त्या जिल्ह्यांना तत्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी करणार आहे, असेही दरेकर यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांना बांधावर बी-बियाणे देण्यात येणार असल्याचे सरकारने सांगितले होते. मात्र, अद्यापही या बियाण्यांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असल्याची टीका दरेकर यांनी केली.