नवी दिल्ली : 17 मेनंतर देशातील लॉकडाऊन उठवणार की वाढवणार? यानंतर सरकारचे केंद्र धोरण आणि योजना काय असतील? याची माहिती केंद्र सरकारने जाहीर कारावी, अशी मागणी कॉंग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी केली. पक्षाच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सने केलेल्या संवादात श्रीमती गांधी बोलत होत्या. सर्व अडथळ्यांवर मात करून धान्य उत्पादन घेतल्याबद्दल शेतकऱ्यांचे विशेषत: पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी सर्व अडथळ्यांवर मात करत गव्हाचे मोठे उत्पादन घेतल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले.
लॉकडाऊन 3.0 संपल्यानंतर काय करणार आहात ते आम्हाला समजले पाहिजे. लॉकडाऊनमधून देशाला बाहेर काढण्यासाठी भारत सरकारची काय योजना आहे? हे मुख्यमंत्र्यांनी विचारले पाहिजे, असे मत माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी व्यक्त केले. तर राहूल गांधी म्हणाले, ज्येष्ठ नागरिक, हृदरोगी आणि मधुमेही यांना करोनापासून वाचवण्याचे धोरण केंद्राने आखले पाहिजे.
अमरिंदरसिंग म्हणाले, लॉकडाऊनमधून कसे बाहेर पडावे आणि अर्थव्यवस्थेला गती कशी द्यावी यासाठी दोन समित्या केंद्र सरकारने स्थापन कराव्यात. प्रत्यक्षातील स्थिती माहित नसणारे दिल्लीतील लोक झोनचे वर्गीकरण करत आहेत, ही आमच्यासाठी चिंतेची बाब आहे.
करोनामुळे झालेला प्रभाव सोसण्यासाठी केंद्राने मदत केली पाहिजे, अशी भूमिका राजस्थानचे अशोक गेलहोत यांनी मांडली. तर राज्याला असह्य वित्तीय तुटीचा सामना कराव लागत असल्याने केंद्राने मदत करावी अशी अपेक्षा छत्तीसगढचे भुपेश बघेल यांनी व्यक्त केली.
राज्य सरकारांना वित्तीय तुटीचा सामना करावा लागत आहे. मात्र निधी केंद्राकडून वर्ग करण्यात येत आहे. माध्यमांनीही राज्यांकडे निधी नसल्याचा मुद्दा मांडला आहे.
पी. चिदंबरम,
मजी केंद्रीय अर्थमंत्री